‘कॅरीबॅगमुक्ती’चे तीन-तेरा
By Admin | Updated: June 23, 2014 00:25 IST2014-06-22T23:18:03+5:302014-06-23T00:25:48+5:30
उस्मानाबाद : पर्यावरणावर होणारे विपरित परिणाम टाळण्यासाठी शहर कॅरीबॅगमुक्त करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत झाले.

‘कॅरीबॅगमुक्ती’चे तीन-तेरा
उस्मानाबाद : पर्यावरणावर होणारे विपरित परिणाम टाळण्यासाठी शहर कॅरीबॅगमुक्त करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत झाले. या मोहिमेच्या अंमलबजावणीला प्रत्यक्ष सुरूवात होवून याला व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाच काही लहान-मोठ्या व्यावसायिकांनी मात्र, कॅरीबॅगचा वापर सुरूच ठेवला होता. त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुकानांना अचानक भेटी देऊन काही व्यवसायिकांकडून कॅरीबॅगही जप्त केल्या. त्याचप्रमाणे जनजागृतीदेखील केली गेली. या सर्व प्रयत्नामुळे मागील काही दिवस कॅरीबॅगचा वापर जवळपास बंद झाला होता. मात्र, त्यानंतर पालिका प्रशासनाच्या कारवाईत सातत्य राहिले नाही. त्यामुळे आजघडीला कॅरीबॅगमुक्त (पालिकेचा दावा) शहरातील फळविक्रेते, लहान-मोठे व्यवसायिक खुलेआम कॅरीबॅगचा वापर करताना दिसून येत आहेत. हे सर्व चित्र पाहिल्यानंतर, शहर कॅरीबॅगमुक्त झाले आहे की नाही, असा प्रश्न पडतो.
सुधारित खेडे म्हणून ओळख असलेल्या उस्मानाबाद शहरासह परिसरातील पर्यावरणावर कॅरीबॅगच्या वाढत्या वापरामुळे विपरित परिणाम जाणवू लागले होते़ येथील व्यापारी महासंघाच्या पुढाकारातून पालिकेने शहर कॅरीबॅगमुक्त करण्याचा संकल्प केला़ १५ मे पासून कॅरीबॅग बंदीची मोहीम सुरू केली़ व्यापारी महासंघाने स्टिकर बनवून अनेक दुकानांमध्ये ते चिटकावून जनजागृती केली़ यासाठी प्रशासन व व्यापाऱ्यांची बैठकही घेण्यात आली़ मात्र, ‘नव्याच्या नऊ दिवस’ याप्रमाणे पालिकेने कारवाईची मोहीम राबविली़ जवळपास १०० ते १२५ व्यापाऱ्यांकडून कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या़ मात्र, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली नाही़ यानंतर पालिकेकडून कोणतीच कारवाई करण्यात आल्याचे दिसत नाही़ त्यामुळे पालिकेच्या कारभाराला ओळखणाऱ्या अनेक व्यापाऱ्यांनी पालिकेच्या परिसरात, बसस्थानक, बार्शी नाका, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आदी परिसरात खुलेआम कॅरीबॅग विक्री सुरू ठेवली आहे़ अनेकांच्या हाती कॅरीबॅग दिसून येत आहे़ विशेष म्हणजे ग्रामीण भागातून येणारा व्यक्ती पिशवी घेवून येत असला तरी शहरातील नागरिकांना अद्यापही कॅरीबॅगची सवय सुटत नसल्याचे दिसत आहे़
५००० रूपये दंड व तीन महिने शिक्षेची तरतूद
पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८७ नुसार व्यापाऱ्यांकडे अथवा नागरिकांकडे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरबॅगची खरेदी-विक्री करताना आढळून आल्यानंतर संबंधितांविरूध्द ५ हजार रूपये दंड व तीन महिन्याच्या कारावासाची शिक्षेची तरतूद आहे. तर वापर करताना आढळून आल्यास १ हजार रूपये दंड करण्यात येणार असल्याच्या सूचनाही पालिकेने दिल्या आहेत़
छुप्या पद्धतीने वापर
शहरातील काळा मारूती चौक, मारवाड गल्ली, नेहरू चौक, बाजारचौक आदी बाजारपेठेच्या ठिकाणी बहुतांश व्यापाऱ्यांनी कॅरिबॅग ठेवणे बंद केले आहे़ असे असले तरी काही व्यापाऱ्यांनी, व्यवसायिकांनी व्यवसायावर परिणाम होवू नये, यासाठी छुप्या पध्दतीने कॅरीबॅग विक्री सुरूच असल्याचे दिसले. अनेक ग्राहकांनी खरेदी केलेला माल कॅरीबॅगमधूनच दिला जातो़
एकावरही दंडात्मक कारवाई नाही !
पालिकेकडून कॅरीबॅग वापरणाऱ्या दुकानदारास एक हजार तर ग्राहकास १०० रूपयांचा दंड आकारण्याचा इशारा दिला होता़ केवळ शहरातील १०० ते १२५ व्यापाऱ्यांकडून कॅरिबॅग जप्त करण्यात आल्या आहेत़ अद्यापपर्यंत दंडात्मक कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले नाही़ प्रारंभीच्या काळात राबविलेली ही मोहीम आता मात्र, गुलदस्त्यात पडली आहे़
मोहिमेत सातत्य गरजेचे
पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टाळण्यासाठी व शहरवासियांच्या आरोग्यावर पडणारे विपरित परिणाम रोखण्यासाठी पालिकेने व्यापारी संघटनेसोबत कॅरीबॅग मुक्तीची मोहीम सुरू केली़ मात्र, सुरूवातीचा काळ वगळता कारवाईची मोहीम थंडावली आहे़ या कारवाईत सातत्य राखले तरच शहर कॅरीबॅगमुक्त राहिल.