औरंगाबाद : निवडणूक कामात हलगर्जी केल्याप्रकरणी पैठण येथील नायब तहसीलदार बाळानाथ जोशी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव आल्यानंतर जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी ही कारवाई केली. पैठण तहसीलमधील संजय गांधी निराधार योजना शाखेचे नायब तहसीलदार बाळानाथ जोशी यांच्याकडे निवडणुकीच्या कामाची जबाबदारी देण्यात आली. मात्र, त्यांनी नेमून दिलेले काम केले नाही. ते कोणतीही सूचना न देता कामावरही गैरहजर राहिले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र पवार यांनी निवडणूक कामात कसूर केल्याप्रकरणी जोशी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांच्याकडे पाठविला होता. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी लगेचच निर्णय घेऊन बाळानाथ जोशी यांना निलंबित केल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र पवार यांनी सांगितले.