कळंब तालुक्यात सर्वात कमी पाऊस !
By Admin | Updated: June 16, 2015 00:48 IST2015-06-15T00:18:12+5:302015-06-16T00:48:57+5:30
उस्मानाबाद : पावसाला सुरूवात झाली असून आजवर जिल्ह्यात सरासरी ५०.९१ मिमी एवढी पावसाची नोंद झाली आहे.

कळंब तालुक्यात सर्वात कमी पाऊस !
उस्मानाबाद : पावसाला सुरूवात झाली असून आजवर जिल्ह्यात सरासरी ५०.९१ मिमी एवढी पावसाची नोंद झाली आहे. कळंब तालुक्यात सर्वात कमी १७.८३ मिमी पाऊस झाला. तर परंडा, भूम आणि लोहारा तालुक्यांमध्ये प्रत्येकी ५० मिमी पेक्षा अधिक पर्जन्यमान झाले आहे. ज्या ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला आहे, तेथील शेतकऱ्यांनी चाढ्यावर मुठ धरली आहे.
मागील तीन-चार वर्षांपासून जिल्ह्यात सातत्याने अत्यल्प पर्जन्यमान होत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय आतबट्याचा ठरत आहे. किमान यंदातरी चागला पाऊस होईल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. अनेक तालुक्यामध्ये सुरूवात चांगली केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. असे असले कळंबसारख्या तालुक्यामध्ये २० मि.मी.ही पाऊस पडलेला नाही. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संबंधित तालुक्यात अवघा १७.८३ मिमी एवढा पाऊस पडला आहे. तसेच उस्मानाबाद तालुक्यातही पेरणीयोग्य पाऊस पडलेला नाही.
आजवर ३३.३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी सर्वाधिक पाऊस झालेल्या तुळजापूर तालुक्यातही आजवर ३४ मिमी एवढा पाऊस झाला. तसेच वाशी ३६.६७ मिमी, उमरगा ५७ मिमी तर परंडा, लोहारा आणि भूम या तालुक्यामध्ये अनुक्रमे ८९.६ मिमी, ६९.३४ मिमी आणि ६८.०९ मिमी एवढा पाऊस पडला आहे. दरम्यान, पावसाला सुरूवात झाली असली तरी कळंबसारख्या तालुक्यातील शेतऱ्यांना आजही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)