भटक्या-विमुक्तांचा धडकला जोरदार मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:10 IST2017-08-10T00:10:08+5:302017-08-10T00:10:08+5:30
आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय भटके विमुक्त आदिवासी संघर्ष महासंघाच्या वतीने आज क्रांतीचौकातून मोठा मोर्चा काढण्यात आला

भटक्या-विमुक्तांचा धडकला जोरदार मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय भटके विमुक्त आदिवासी संघर्ष महासंघाच्या वतीने आज क्रांतीचौकातून मोठा मोर्चा काढण्यात आला. तो विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. तेथे झालेल्या जाहीर सभेत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
जिल्ह्याच्या कानाकोपºयातून भटक्या-विमुक्त समाजाचे स्त्री-पुरुष या मोर्चात सहभागी झाले होते. त्यात अनेक जण पारंपरिक वेषभूषेत होते. एकलव्य, संत रविदास, सेवालाल महाराज, शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता जिजाऊ, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांचा जयजयकार मोर्चेकरी करीत होते. दोन-दोनच्या रांगेत प्रत्येक जण चालत होता. लाऊडस्पीकरवरून त्यांना संयोजकांतर्फे योग्य त्या सूचना दिल्या जात होत्या.
या मोर्चात सहभागी झालेल्या बहुतांश जणांजवळ रेशन कार्ड नाही, मतदान कार्ड नाही, आधार कार्डही नाही. शिवाय राहायला घरही नाही. अनेक जणांनी शाळेचे तोंडही पाहिलेले नाही. त्यांनी केलेल्या प्रमुख मागण्या अशा- सीमा राठोड या बंजारा समाजाच्या मुलीच्या निर्घृण हत्येची कसून चौकशी करून दोषींना फाशी देण्यात यावी, वन विभागाच्या जमिनी व गायरान जमिनी कसणाºयांच्या नावे सातबारा करण्यात यावा, जातीचे दाखले, रेशन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड घरपोच देण्यात यावेत, आदिवासी शबरी माता विकास महामंडळाला एक हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा, या महामंडळाचे कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात सुरू करण्यात यावे, वसंतराव नाईक महामंडळाची कर्जे माफ करण्यात यावीत, शिक्षणाचे खाजगीकरण रद्द करण्यात यावे, आदिवासी, भटक्या, विमुक्त व ओबीसी शेतकºयांना पेन्शन योजना लागू करण्यात यावी, भिल्ल- आदिवासी, भटके- विमुक्त सगाजाचे लोक ज्या गावात राहतात, त्या गावाचे तळे मच्छीमारासाठी उपलब्ध करून द्यावे, मंडल आयोगाच्या शिफारशींची शंभर टक्के अंमलबजावणी करून ओबीसींना न्याय देण्यात यावा.
महासंघाचे अध्यक्ष अशोक जाधव धनगावकर व कार्याध्यक्ष राजपालसिंह राठोड यांनी या मोर्चाचे संयोजक म्हणून काम पाहिले. प्राचार्य ग.ह. राठोड, अंबादास राठोड, प्राचार्य सुनील वाकेकर, मुकुंद सोनवणे, जि.प. सदस्य रमेश गायकवाड, प्रा. प्रकाश वाघमारे, पंडित चव्हाण, राजेंद्र जाधव, गोरख मोरे, नामदेव दळवे, अशोक मोरे, डॉ. कृष्णा राठोड, ज्ञानेश्वर ढाकणे, गणेश चव्हाण, प्रा. आर.जी. देठे, पल्लवी खंडेराव, अंकुश चव्हाण, अजित तडवी, सुनील कचरू ठाकरे, जगन बाबर, बाबालाल जाधव, महादू पगारे, अरविंद कांबळे, दादाराव आळणे, प्रदीप त्रिभुवन, धम्मानंद गायकवाड, विनोद वाघमारे, रत्नदीप कांबळे, कोंडबा हटकर, मिलिंद वानखेडे, महादेव आंधळे, विष्णू वखरे, डॉ. शरद वानखेडे, संजय मेडे, अजित तडवी आदींनी या मोर्चाचे नेतृत्व केले. खोजेवाडी, वडगाव, दिवशी पिंपळगाव, रांजणगाव पोळ, सिद्धिशिरसगाव, दायगाव, देहडे, गाजगाव, पिंपळगाव खंडाळा, वैरागड, खडक नारळा, डोणगाव, बाभूळगाव नांगरे, टाकळी, वडाची वाडी, टुणकी, टेंभी, पालखेड, कानडगाव, शिरोडी, तुर्काबाद खराडी, कौडगाव, देवगाव रंगारी, फेरन जळगाव, चौका, पिंपळखुंटा, दौलताबाद, बोरसर आदी गावांमधून हे भटके-विमुक्त आले होते.