नोकरी, छोकरी भेटली...पगार मात्र मिळेना!
By Admin | Updated: May 23, 2014 00:22 IST2014-05-22T23:40:27+5:302014-05-23T00:22:49+5:30
जालना : ग्रामीण भागात स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी दीड वर्षापूर्वी कंत्राटी पध्दतीने २५ आरोग्य सल्लागारांच्या (गट संसाधन कर्मचारी) नियुक्त्या करण्यात आल्या होत्या

नोकरी, छोकरी भेटली...पगार मात्र मिळेना!
जालना : जिल्हा परिषदेच्या निर्मल भारत योजनेअतंर्गत ग्रामीण भागात स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी दीड वर्षापूर्वी कंत्राटी पध्दतीने २५ आरोग्य सल्लागारांच्या (गट संसाधन कर्मचारी) नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या तीन महिन्यापासून वेळेवर पगार मिळत नसल्याने या कर्मचार्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गेल्या दीड वर्षापासून ग्रामीण भागात स्वच्छता, आरोग्याविषयी मोठी जनजागृती करण्याचे काम या कर्मचार्यांनी केले. पावसाळा जसजसा जवळ येत आहे. तसतसे आप-आपल्या कार्यक्षेत्रातील गावोगावी फिरून ते ग्रामस्थांना विविध विषयांवर माहिती सांगत आहेत. परंतु या कर्मचार्यांचे गेल्या तीन महिन्यापासूनचे वेतन रखडले आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याची खंत काही कर्मचार्यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली. पावसाळ्यामंध्ये ग्रामीण भागात आरोग्यासंदर्भात मोठ्या समस्या निर्माण होतात. तसेच साथीचे रोग पसरतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आरोग्य सल्लागार स्वच्छतेबद्दल जनजागृती करत आहेत. जबाबदारीने आणि आत्मियतेने काम करूनही वेळेवर वेतन होत नसल्याने अनंत अडचणी निर्माण होत असल्यामुळे कर्मचार्यांत नाराजीचा सूर आहे. पगाराविना कसे काम करावे, असा प्रश्न या कर्मचार्यांतून उभा राहत आहे. नौकरीच्या भरवशावर छोकरी भेटली. परंतु, वेळेवर पगार होत नसल्याने संसाराचा गाडा चालविणे कठिण होत असल्याचे आरोग्य सल्लागारांनी नाव न टाकण्याच्या अटीवर माहिती दिली. काम करावे की नाही अशी परिस्थीती आरोग्य सल्लागारावर आली आहे. आमच्या प्रश्नांकडे संबधीत विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. आरोग्य आणि स्वच्छतेविषयी शासन विविध प्रकारच्या योजना राबवित आहे. त्यासाठी सर्वच माध्यमांतून मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येतो. मात्र, या कर्मचार्यांच्या वेतनासंदर्भात प्रशासनाने गंभीर भूमिका घेतली नसल्याचे चित्र आहे. आरोग्य सल्लागारांच्या वेतनासंबंधी प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)