सहस्र दीपांनी उजळले जटवाडा!

By Admin | Updated: December 19, 2014 01:00 IST2014-12-19T00:15:05+5:302014-12-19T01:00:11+5:30

उदयकुमार जैन, औरंगाबाद श्री १००८ संकटहर पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र जटवाडा येथे गुरुवारी वार्षिक यात्रा महोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला.

Jhatwada brightened with Saharsa lamp! | सहस्र दीपांनी उजळले जटवाडा!

सहस्र दीपांनी उजळले जटवाडा!

उदयकुमार जैन, औरंगाबाद
श्री १००८ संकटहर पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र जटवाडा येथे गुरुवारी वार्षिक यात्रा महोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. पार्श्वनाथ भगवंतांच्या २७९१ व्या जन्मकल्याणक दिवसाचे औचित्य साधून भाविकांच्या हस्ते २७९१ दीपांनी भगवंतांची महाआरती करण्यात आली. हा दीपोत्सव व महामस्तकाभिषेक सोहळा या यात्रेचे वैशिष्ट्य ठरले.
यंदाची यात्रा लक्षवेधी ठरली ती महाआरतीमुळे. भक्तिभावाचे मंगलमय सूर आणि गुलाबी थंडीत देशभरातील हजारो भाविकांची मांदियाळी दिवसभर येथे दिसली. सकाळी नेमीचंद, विपीन, भारती, नितीन, अश्विनी कासलीवाल परिवाराच्या हस्ते कल्याण मंदिर विधान पूजन झाल्यानंतर यात्रोत्सवास प्रारंभ झाला. यानंतर प्रेमचंद, सुरेशचंद, मयूरकुमार, मधुरकुमार अजमेरा परिवाराच्या हस्ते धर्मध्वजारोहण झाले. बोलियाच्या कार्यक्रमानंतर कुबेर चौगुले (उदगाव) यांच्या साग्रसंगीतात भगवंतांचा पंचामृत महामस्तकाभिषेक करण्यात आला. यावेळी ससंघ उपस्थित असलेले संकटमोचन रोगनिवारक मुनीश्री १०८ गिरणारसागरजी महाराज, संस्कारसागरजी महाराज, गणिनी आर्यिकारत्न श्री १०५ क्षमाश्री माताजी यांच्या मंत्रोच्चाराने भाविकांचा उत्साह वाढत होता. इंद्र-इंद्रायणीचा मान भरतकुमार शांतीलाल डोंगरे परिवाराला, अर्चनाफलचा मान प्रमोदकुमार हंसराज पांडे परिवाराला, तर शांतीधाराचा मान धरमचंद चांदमल पाटणी परिवाराला मिळाला. महाप्रसाददाता फुलचंद, प्रमोदकुमार, कुणाल, भवित, सुषमा, रेखा, कुशानी दगडा परिवारासह सर्व दात्यांचा अतिशय क्षेत्रातर्फे सत्कार करण्यात आला. संचालन महामंत्री देवेंद्र काला यांनी केले. यशस्वीतेसाठी क्षेत्राच्या पदाधिकाऱ्यांसह ललित पाटणी, एम.आर. बडजाते, प्रमोदकुमार कासलीवाल, महावीर साहुजी, केशरीनाथ जैन, संजय पाटणी, अशोक गंगवाल, कमल कासलीवाल, रमणलाल गंगवाल, मनोज चांदीवाल, सूर्यकांत साहुजी, अशोक अजमेरा, प्रकाश कासलीवाल, प्रमोद पांडे, भरत ठोळे, सुरेश कासलीवाल आदींसह कर्मचारी, समाजबांधव, महिलांनी परिश्रम घेतले. गर्दीमुळे जटवाड्याला पंढरीचे स्वरूप आले होते. यात्रेकरूंसाठी क्षेत्रातर्फे सुसज्ज नियोजन करण्यात आले होते.
संतांची अमृतवाणी
मुनीश्री १०८ गिरणारसागरजी महाराज व क्षमाश्री माताजी यांचे प्रवचन झाले. महाराजांनी जटवाडा, कचनेर, पैठण, वेरूळ येथील अतिशय क्षेत्रांची महती विशद केली. अतिशय क्षेत्रावर येऊन दर्शन घेतल्याने संकटे आपोआप दूर होतात, असे त्यांनी सांगितले.
खराब रस्त्यामुळे त्रास
जटवाडा रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, आज यात्रेसाठी आलेल्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागला. खड्ड्यांमुळे वाहने चालविणे जिकिरीचे झाले होते. बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

Web Title: Jhatwada brightened with Saharsa lamp!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.