'जायकवाडी'तून माजलगाव धरणात पाणी सोडले; बीड,माजलगावसाठी दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 06:08 PM2019-08-09T18:08:13+5:302019-08-09T19:03:58+5:30

जायकवाडी धरणाचा पाणीसाठा दुपारी ४ वाजेपर्यंत ७१.१० टक्क्यांवर

Jayakwadi releases water in Majalgaon Dam; relief for Beed, Majalgaon | 'जायकवाडी'तून माजलगाव धरणात पाणी सोडले; बीड,माजलगावसाठी दिलासा

'जायकवाडी'तून माजलगाव धरणात पाणी सोडले; बीड,माजलगावसाठी दिलासा

googlenewsNext
ठळक मुद्देपैठण ते माजलगाव धरणाचे अंतर १३२ किमी जायकवाडीचे पाणी माजलगाव धरणात पोहचण्यासाठी २४ तासाचा कालावधी

औरंगाबाद/बीड : जायकवाडी धरणातून पैठण उजव्या कालव्याद्वारे माजलगाव धरणात शुक्रवारी दुपारी ४०० क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला. येत्या दोन दिवसात जवळपास ३ टीएमसी पाणी धरणातून सोडण्यात येणार असल्याची माहिती आहे. जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात माजलगाव धरणासाठी जवळपास २०० दलघमी पाणी कायम स्वरूपी आरक्षित आहे. सध्या माजलगाव परिसरात सरासरी पाऊस न झाल्याने धरणात अत्यंत कमी जलसाठा आहे. जायकवाडी धरणातून माजलगाव धरणाचे आरक्षित पाणी सोडण्यात यावे या बाबत मागणी होत होती.

आज दुपारी जायकवाडी धरणात ७०% पेक्षा जास्त जलसाठा झाल्याने माजलगाव धरणासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले. दरम्यान दुपारी दोन वाजता धरण अभियंता बुध्दभूषण दाभाडे, आर ई चक्रे आदीच्या मार्गदर्शनाखाली पथकाने उजव्या कालव्याचे दरवाजे वर उचलून कालव्यात ४०० क्युसेक क्षमतेने पाणी सोडले. कालव्यातील विसर्ग टप्याटप्याने वाढवून तो जास्तीत जास्त ९०० क्युसेक पर्यंत वाढविण्यात येईल असे दाभाडे यांनी सांगितले. माजलगाव साठी पहिल्या टप्प्यात ७५ दलघमी पाणी सोडण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

नाशिक विभागात मागीण काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात पाणीसाठा ७० टक्क्यांच्यावर पोहंचला  आहे. बीड जिल्ह्यात मात्र, अद्यापही पाऊस अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही. त्यामुळे माजलगाव धरणाची पाणी पातळी वाढलेली नाही. बीड शहराला पाली येथील बिंदुसरा व माजलगाव धरणातून पाणी पुरवठा केला जातो. बिंदुसरा धरण तर महिन्यापूर्वीच मृत साठ्यात गेले आहे तर माजलगाव धरणातील पाणी पातळीही मोठ्या प्रमाणात खालावली आहे. बीडला पाणीपुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणातील उद्भवापासून जवळपास अडीचशे मिटर पाणी आत गेले आहे. त्यामुळे पालिकेने उपाययोजना म्हणून सात मिटर खोल व अडीचशे मिटर दुर अशी चारी खोदली आहे. याद्वारे सध्या पाणी उपसा केला जात आहे. सध्या जरी उपाययोजना केल्या असल्या तरी आतापर्यंत पाऊस पाहता ही परिस्थिती यापुढे गंभीर बनण्याची शक्यता आहे. 

( जायकवाडी ६३ टक्क्यांवर; मराठवाड्यातील उर्वरित प्रकल्पांत ठणठणाट )

हाच धागा पकडून बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंधारण मंत्री दिपक सावंत यांच्याकडे जायकवाडी धरणातून ३ टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली होती. याबाबत मंत्रीमंडळाची बैठक झाली. रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ही मागणी लावून धरली. याला बैठकीत मंजुरी मिळाली. यानंतर आज दुपारी जायकवाडीतून ४०० क्युसेक पाण्याच्या विसर्ग करण्यात आला. दरम्यान, जायकवाडी धरणाचा पाणीसाठा दुपारी ४ वाजेपर्यंत ७१.१० टक्के झाला होता. जायकवाडी धरणात वरील धरणातून पाण्याची आवक सुरूच आहे. सद्या 71 हजार 335 क्यूसेसने गोदावरीमार्गे जायकवाडीत पाणी येत आहे. धरणाची पाणी पातळी पाहता यावेळी मराठवाड्यावरील दुष्काळाचे संकट टळले आहे .

जायकवाडी धरणात जलसाठा ७३% होत आल्याने आज माजलगाव धरणासाठी जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून ४०० क्युसेक्स क्षमतेने पाणी सोडण्यात आले. पैठण ते माजलगाव धरणाचे अंतर १३२ किमी असून जायकवाडीचे पाणी माजलगाव धरणात पोहचण्यासाठी २४ तासाचा कालावधी लागेल असे धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी सांगितले.

Web Title: Jayakwadi releases water in Majalgaon Dam; relief for Beed, Majalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.