जायकवाडीला दोन टीएमसीची गरज
By Admin | Updated: July 25, 2016 01:07 IST2016-07-25T01:00:20+5:302016-07-25T01:07:54+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण जुलैअखेरीसही मृतसाठ्यातच आहे. मृतसाठ्यातील तूट भरून जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी २ टीएमसी पाण्याची गरज आहे.

जायकवाडीला दोन टीएमसीची गरज
औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण जुलैअखेरीसही मृतसाठ्यातच आहे. मृतसाठ्यातील तूट भरून जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी २ टीएमसी पाण्याची गरज आहे. सध्या धरणात वरच्या भागातून १८८२ क्युसेक्सने आवक सुरू आहे.
जायकवाडी धरणातील जिवंत साठा यंदा मार्च महिन्यातच संपला होता. तेव्हापासून मृतसाठ्यातील पाण्याचा वापर केला जात आहे. या धरणाची जिवंत साठ्याची क्षमता २१७१ दलघमी इतकी आहे. तर मृतसाठ्याची क्षमता ७३८ दलघमी आहे. १ जुलैपर्यंत मृतसाठ्यातूनही सुमारे २६५ दलघमीचा उपसा झाला होता. मात्र, त्यानंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काहींसा पाऊस झाल्यामुळे धरणात पाण्याची आवक सुरू झाली. शिवाय वरच्या धरणांतूनही पाण्याचा विसर्ग सुरू झाला. त्यामुळे आतापर्यंत धरणात सुमारे २०० दलघमी पाण्याची आवक झाली. तरी हे धरण अजूनही मृतसाठ्यातच आहे.
रविवारी जायकवाडीच्या मृतसाठ्यात ६८१ दलघमीपर्यंत मृतसाठा पोहोचला. त्यामुळे मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी ५७ दलघमी म्हणजे सुमारे अडीच टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यानंतरच जिवंत साठ्यात पाणी साठण्यास सुरुवात होईल. आतापर्यंतची ही सर्वाधिक वाईट परिस्थिती असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याआधी याच तारखेला २०११ साली धरणाच्या जिवंत साठ्यात ३५२ दलघमी साठा होता. २०१२ साली ७ दलघमी, २०१३ साली शून्य, २०१४ साली ४१ दलघमी पाणीसाठा होता.