जलयुक्त शिवार अभियान शेतकऱ्यांसाठी वरदान
By Admin | Updated: June 22, 2015 00:18 IST2015-06-21T23:35:17+5:302015-06-22T00:18:41+5:30
फकिरा देशमुख , भोकरदन भोकरदन तालुक्यात राज्यशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेले जलयुक्त शिवार योजना ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. पहिल्याच पावसात सिंमेट बंधाऱ्यात साठविलेल्या पाण्यामुळे

जलयुक्त शिवार अभियान शेतकऱ्यांसाठी वरदान
फकिरा देशमुख , भोकरदन
भोकरदन तालुक्यात राज्यशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेले जलयुक्त शिवार योजना ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. पहिल्याच पावसात सिंमेट बंधाऱ्यात साठविलेल्या पाण्यामुळे १ हजार ५०० हेक्टर क्षेत्र सिंंचनाखाली येणार आहे़
भोकरदन तालुका तसा कोरडवाहू म्हणून प्रसिध्द आहे. या तालुक्यातून पूर्णा, केळणा व जुई या नद्या वाहतात. मात्र यापैकी केळणा व पूर्णा नदीवर सिल्लोड व कन्नड तालुक्यात मध्यम प्रकल्प बांधण्यात आले असल्याने या नद्यावर भोकरदन तालुक्यात मध्यम प्रकल्प होण्याची शक्यता नाही तरी सुध्दा विदर्भातील देऊळगाव मही येथे उभारण्यात आलेल्या खडक पूर्णा प्रकल्पामुळे जाफ्राबाद तालुक्यातील सिंचन क्षेत्रवाढीला मोठी मदत झाली आहे भोकरदन तालुक्यात लघु सिंचन जलसंधारण उपविभाग, तालुका कृषी कार्यालय व जिल्हापरिषदेच्या सिंचन विभागा मार्फत जलयुक्त शिवार योजनेची कामे सुरू आहे. या सर्व कामासाठी सुमारे १० कोटी रुपयापर्यतच्या कामाना मंजुरी मिळाली आहे.
यामुळे तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेमध्ये निवड करण्यात आलेल्या भोकरदन, पेरजापूर, सुभानपूर, गोकुळ, फत्तेपुर, पल्हादपुर, वाडी, ईब्राहिमपूर, गारखेडा, बंरजळा लोखंडे, कोदोली, टाकळी भोकरदन, सावखेडा, राजूर, पळसखेडा पिंपळे, आन्वा, जळगाव सपकाळ, हिसोडा बु, पिंपळगाव रेणुकाई, धावडा, विझोरा, पोखरी, मेहेगाव, तळणी, रेलगाव, आव्हाना, लिगेंवाडी, सावंगी आवघडराव, आव्हानावाडी, जोमाळा, तांदूळवाडी या ३४ गावामध्ये भविष्यात पाणी टंचाई भाषणार नाही अशी स्थिती होणार आहे़
तालुक्यात लघु सिंचन जलसंधारण विभागाच्या वतीने ५० सिमेन्ट बंधाऱ्यांचे कामे सुरू आहे. त्या पैकी २७ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तर कृषी विभागाकडून सुध्दा नाला माती बांध, चर खोदकाम, नाला खोलीकरण व सरळीकरणची कामे हाती घेण्यात आली आहेत. आतापर्यन्त ९३४ कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी ६१३ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तर ३२१ कामे प्रगती पथावर आहेत. या कामांवर २ कोटी ६९ लाख ७८ हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत.
जलयुक्त शिवार योजना ही शेतकऱ्यांसाठी मोठी वरदान ठरणारी योजना शासनाने सुरू केली आहे. कारण पावसाचा एक एक थेंब आपल्या परिसरात जिरविण्यासाठी सिमेन्ट बाध, नाला खोलीकरण, चारी खोदकाम, शेतीमाती बांध हे एक उपयुक्त साधन आहे.
कारण जर एखादा प्रकल्प उभारण्यासाठी आजच्या काळात शेतकरी जमीन देणे शक्य नाही, त्यामुळे प्रत्येक शेताच्या बाजूने वाहनाऱ्या नाल्याच्या माध्यमातून जर पाणी आडवून सिंचन क्षेत्र वाढविता आले तर त्याचा मोठा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी सुध्दा सिमेंट बांध होत असताना शेताच्या बांधावर माती टाकणे आवश्यक आहे. पाणी आडले पाहिजे, मात्र दुसऱ्याच्या जमिनीत बांध होऊन त्याचा फायदा आपल्याला व्हावा ही मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे़