केवळ सासूला दोष देणे चुकीचे
By Admin | Updated: June 12, 2014 00:12 IST2014-06-11T23:59:31+5:302014-06-12T00:12:24+5:30
व्याख्यान कार्यक्रम : अपर्णा रामतीर्थकर यांचे प्रतिपादन

केवळ सासूला दोष देणे चुकीचे
परभणी : आई आपल्या मुलीवर संस्कार करण्यासाठी कमी पडत आहे़ त्यामुळे आज कुटुंबव्यवस्थाच ढासळत चालली आहे़ सध्या मुलीच्या संसारात आईचा हस्तक्षेप वाढल्याने किरकोळ कारणावरून कौटुंबिक वाद निर्माण होत आहेत़ म्हणून केवळ सासूलाच दोष देणे चुकीचे आहे़, असे प्रतिपादन अॅड़ अपर्णा रामतीर्थकर यांनी केले़
येथील श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात स्वक़ुसुमबाई विठ्ठलराव दुधाटे यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त मातृगौरव या विषयावर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ त्याप्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या़ अध्यक्षस्थानी डॉ़ संध्याताई दुधगावकर होत्या़ यावेळी अॅड़ रमेशराव दुधाटे गोळेगावकर, सुनंदा दुधाटे, प्रकाश दुधाटे, दिलीपराव दुधाटे, संगीता दुधाटे, प्रेमा कदम आदींची उपस्थिती होती़
अॅड़ रामतीर्थकर म्हणाल्या, परदेशी शिक्षण पद्धतीतून आधुनिकतेकडे जाताना आपण आपल्या परंपरा आणि संस्कार विसरत चाललो आहोत़
यामुळे घरातील महिलांचे आईपण हरवलेले दिसते़ संसार आणि शिक्षण यांचा समन्वय अतिशय आवश्यक आहे़ स्त्रीने कितीही शिक्षण घेतले तरी ती स्त्रीत्व टिकविले पाहिजे़
बायकांनी परंपरा व संस्काराचे भान सोडू नये़ भारतीय स्त्री ही त्या कुटुंबाची मुलगी तर असतेच पण सोबतच ती त्यांचा विश्वास असते़, श्वास असते, मर्यादा असते आणि गृहिणी असते़ तिने उदात्त पत्नी आणि उदात्त माता असायला हवे़ एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रिला समजून घेतले पाहिजे तरच घरातील नाते टिकते़
नेहमीच मुलींना स्त्री असल्याची जाणीव करून द्या, त्यामुळे आजच्या फॅशनच्या युगात मुली मर्यादा ओलांडणार नाहीत, असे त्यांनी यावेळी सांगितले़ (प्रतिनिधी)
शिक्षणामुळे मुली स्वावलंबी बनल्या असल्या तरी नाती, संस्कार, नम्रता, शील संपले आहे, असा प्रश्न उपस्थित करून महिलांनी कोणतेही काम करताना आपली लक्ष्मणरेषा ओलांडू नये, ज्याला आई समजली त्याला जग समजले़ पूर्वीची आणि सध्याची कुटुंबव्यवस्था यामध्ये खूप अंतर पडले आहे़ आज जुनी संस्कृती, नीतिमूल्ये, मान, सन्मान, आदराची भावना, रुढी, परंपरा या गोष्टींचा विसर पडत चालला आहे, असे अॅड़ अपर्णा रामतीर्थकर यांनी सांगितले़
पूर्वीच्या अशिक्षित आया शिकलेल्या नव्हत्या पण संस्कारक्षम होत्या़ आजच्या आया उच्चशिक्षित असल्या तरी फ्लॅट संस्कृतीमुळे कुटुंबव्यवस्थाची मृत्यू घंटा वाजायला सुरुवात झाल्याचे रामतीर्थकर यांनी सांगितले़