जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान...
By Admin | Updated: December 3, 2014 01:17 IST2014-12-03T00:57:29+5:302014-12-03T01:17:00+5:30
व्यंकटेश वैष्णव , बीड आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे रडतोस काय वेड्या लढण्यात शान आहे

जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान...
व्यंकटेश वैष्णव , बीड
आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे
रडतोस काय वेड्या लढण्यात शान आहे
काट्यात ही फुलांची ,झुलती कमान आहे
उचलून घे हवे ते, दुनिया दुकान आहे
जगणे निरर्थक म्हणतो, तो बेईमान आहे.
या सुरेश भटांच्या कवितेच्या ओळीतील बळ अपंगाच्या भरारीत पहावयास मिळते. तेव्हा धडधाकट माणसांच्या कतृत्वाला लाजवेल, असे काम नसलेल्या हातून होत असल्याचा प्रत्यय मंगळवारी आला. स्वत: च्या वेदनांची कैफीयत इतरांना सांगून, कोणी तरी आपल्यावर कीव करावी. या मानसिकतेला छेद देऊन अपंग असताना देखील कुटुंबांचा आधार बनलेल्या लढवय्यांची जिद्द वाखण्यासारखी आहे. जागतिक अपंगदिनाच्या निमित्ताने अशा लढवय्यांच्या प्रवासाचा घेतलेला आढावा.
अविनाश मुडेगावकर ल्ल अंबाजोगाई
अपंगत्व असतानाही त्यावर मात करीत इतर सामान्य माणसांप्रमाणेच बँकेच्या दैनंदिन कामकाजात सहाय्यक व्यवस्थापक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका निष्ठेने सांभाळणाऱ्या अभिजित सुगावकर - देशपांडे, यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. दोन्ही हातांना बोट नसतांनाही मनगटाच्या साह्याने ते संगणकाची हाताळणी करून बँकेचा व्यवहार सांभाळतात. त्यांचे अक्षरही अत्यंत सुंदर आणि वळणदार आहे. दोन्ही हाताला बोटे नसतांनाही त्यांचे वळणदार अक्षर पाहून पाहणारा व्यक्ती अचंबित होतो.
अंबाजोगाई येथील अभिजित सुगावंकर-देशपांडे हे येथील वैद्यनाथ सहकारी बँकेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून गेल्या १७ वर्षांपासून काम पाहतात. अंगी अपंगत्व असतानाही सामान्य माणसांप्रमाणे त्यांचा दिनक्रम कायम सुरू असतो. अभिजित यांच्या दोन्ही हातांना बोटे नाहीत. जन्मत:च अपंगत्व प्राप्त झाल्याने हात मनगटापर्यंत तर पायांचीही स्थिती तशीच आहे. पायांनाही बोटे नाहीत. परंतु अभिजित यांना आपल्या अपंगात्वाबद्दल बालवयापासून कधीही संकोच वाटला नाही. सामान्य माणसाप्रमाणे त्यांचे दैनंदिन जीवन नियमित सुरू आहे. वैद्यनाथ बँकेत १७ वर्षांपूर्वी लिपिकाच्या पदासाठी ते मुलाखतीस परळीला गेले. मुलाखतीच्या वेळेस अभिजित यांच्याकडे पाहून ही अपंग व्यक्ती काम कशी करेल? याची खात्री संचालक मंडळाला वाटेना. त्यांनी अभिजित यास लिहिण्यास सांगितले. त्यांचे अक्षर पाहून उपस्थित संचालक मंडळी भारावून गेली आणि अभिजित यांना बँकेत रुजू करून घेण्यात आले. वैद्यनाथ बँकेच्या बीड, परळी अशा विविध शाखांमध्ये काम केल्यानंतर ते आता अंबाजोगाईच्या शाखेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. इतर कर्मचाऱ्यांसोबत त्यांच्या बरोबरीने त्यांच्या कामाचा झपाटा सुरू असतो. संगणक हाताळणी असो वा लिखाणाचे काम कोणत्याच बाबतीत त्यांची माघार नसते. बँकेत कामकाजासाठी आलेला ग्राहकही अभिजित यांच्याकडे पाहून आचंबित होतो. अंगी असलेल्या अपंगत्वावर मात करत सामान्य माणसांप्रमाणे जीवन जगण्याची त्यांची हातोटी अपंगांसाठी प्रेरणादायी ठरेल.
राजेश खराडे ल्ल बीड
धड मराठी बोलता न येणारा उत्तरप्रदेशातील अमरसिंह कुशवाह या अपंग पण उमद्या तरूणाने बीडमध्ये येऊन हातगाडा चालवायला सुरूवात केली. पोटाची खळगी भरण्यासाठी राज्य सोडून येताना रक्ताच्या नात्याला तो दुरावला.
जन्मताच अपंग असलेल्या अमरसिंगने हिंमत सोडली नाही. एका पायाने पूर्णत: अपंग असतानाही तो महिन्याकाठी पाच ते सहा हजार रुपये कमावतो, असे त्याने मोठ्या अभिमानाने सांगितले. जगण्याचा आधार बनलेली फक्त काठीच सध्या अमरसिंग कुसवा यांचा आधार म्हणून जवळ राहिली आहे.
आग्रा येथील अमरसिंग गेल्या दोन वर्षांपासून गाव सोडून शहरातील सुभाष रोड येथे गाड्यावर कपडे विकण्याचे काम रोजंदारीने करीत आहे. कुटुंबातील सर्व सदस्य हे रोडवरील दगडी कामकाज करण्यासाठी बाहेर पडत असत. पण अमरसिंगला जन्मताच अपंगत्व आल्याने जड वस्तू उचलण्यात त्रास होत होता. इतर ठिकाणीही काम मिळणे मुश्लिक असल्याने त्याने आपल्या मित्रांसमवेत थेट राज्य सोडले.
दिवसाकाठी फक्त दोनशे रुपयांसाठी अमरसिंगला तब्बल बारा तास एका पायावर उभे रहावे लागत आहे. एका पायाने अपंगत्व असल्याने उभे राहिल्यावर काठीचा तर हातगाडा ढकलताना गाड्याचा आधार घ्यावा लागत आहे. या कामातून महिन्याला सहा हजार मिळकत असल्याने अमरसिंग गावाकडे जाणेही टाळत आहेत. मात्र अशा परिस्थितीवर हसतमुखाने मात करून आनंदी राहण्याचा प्रयत्न ते करीत आहेत.
पुरुषोत्तम करवा ल्ल माजलगाव
वयाच्या पाचव्या वर्षीच अपघाताने अपंगत्व आले. अपघातात एक हात निकामी झाला. यामुळे कुठलेच जड काम करता येणे शक्य नाही. मात्र न खचता त्याने बुट, चप्पल विक्रीचा व्यवसाय सुरू केला. चक्क एका हातानेच त्यांना ओढावा लागतो कुटुंबाचा व चप्पल, बुटचा गाडा...
माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथील रहिवाशी अंकुश हिरामन कांबळे या पंचेवीस वर्षीय अपंग अंकुशच्या घरची परिस्थिती हालाकिचीच. अंकुश लहान असताना आई वडील कामाच्या शोधात मुंबईला गेले होते. मुंबईत आई-वडीेल काम करत असताना रस्त्यावर खेळत असलेल्या अंकुशला एका अज्ञात वाहनाने धडक दिली. यात अंकुशचा उजवा हात निकामी झाला होता. त्या घटनेनंतर आई वडिलांनी आपले गाव गाठले. अंकुश मोठा झाल्यावर कुटुंबाची सर्व जबाबदारी अपंग अंकुशवर आली. मात्र तो डगमगला नाही. कसेबसे चार पैसे गोळा करून त्याने माजलगाव येथे चप्पल, बुटचा गाडा टाकला. यातून मिळणाऱ्या पैशावरच अंकुश आपल्या तीन मुलांचे शिक्षण करत आहे. त्याच्या या खडतर प्रवासात त्याची पत्नी मंगल ही त्याची मदत करते. असे अंकुश सांगतो. आपला व्यावसाय मोठा करण्यासाठी त्याने शासन दरबारी मदत मागितली मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याचे त्याचे म्हणणे आहे.