शेती औजारांसाठी लाकडाऐवजी लोखंडाचा वापर
By Admin | Updated: June 9, 2014 01:13 IST2014-06-09T00:39:28+5:302014-06-09T01:13:27+5:30
मदन बियाणी , कनेरगाव नाका दिवसेंदिवस जंगले नष्ट होत असल्याने खेड्यापाड्यात शेतीसाठी वापरली जाणारी लाकडी अवजारे दुर्मिळ होत चालली आहेत.

शेती औजारांसाठी लाकडाऐवजी लोखंडाचा वापर
मदन बियाणी , कनेरगाव नाका
दिवसेंदिवस जंगले नष्ट होत असल्याने खेड्यापाड्यात शेतीसाठी वापरली जाणारी लाकडी अवजारे दुर्मिळ होत चालली आहेत. त्यांची जागा आता लोखंडी अवजारांनी घेतल्याचे चित्र असून सुतारांच्या व्यवसायावर संकट आले आहे. सध्या खरिपाच्या पेरणीची लगबग चालू झालेली असली तरी सुताराकडे शेतीऔजारे बनविण्याचे काम कमी झाल्याचे दिसत आहे.
आपल्याकडच्या सामाजिक व्यवस्थेत बारा बलुतेदारांना महत्वाचे स्थान होते. संपूर्ण जनजीवन या बलुतेदारांभोवती फिरायचे. वस्तूंची देवाणघेवाण होऊन व्यवहार व्हायचे. बलुतेदार पिढ्यानपिढ्या तोच व्यवसाय करायचे. सुतार, लोहार, चांभार, कुंभार, सोनार अशा बलुतेदारांच्या अनेक पिढ्यांनी त्यांंच्या कामाबरोबरच एक कलाही जोपासली, वाढविली आहे. विकासाच्या ओघात काही बलुतेदारांनी इतर शिक्षण घेऊन, पारंपारिक शिक्षण घेऊन अन्य मार्ग पत्करले आहेत. मात्र बहुतांश सुतार व्यावसायिक समाज आजही आपल्या पारंपारिक कलेवर उपजीविका करीत आहेत.
शेतकऱ्याला आवश्यक असणारी अवजारे बनविणे व दुरूस्ती करण्याचे काम सुतार या बलुतेदाराकडे असे. शेतीसाठी लागणारे नांगर, पाभर, तिफण, वखर, बैलगाडी इत्यादी अवजारे सुतार बनवित असे.
प्राचीन काळी मंदिरे ही लाकडाची बनवली जात असत. एवढेच नाहीतर देवमूर्तीही लाकडाच्या असायच्या. कालांतराने लाकडी मंदिरे मागे पडली असली तरी सुतारकामाचे महत्व संपले नाही फर्निचर आणि लाकडी मूर्ती, शिल्पे यांच्यापुरताच मर्र्यादित राहिल्याचे चित्र आहे. अलीकडच्या काळात सुताार व्यवसाय हा परंपरागत बैलगाड्या, नांंगर, लाकडी चाके अदृश्य होऊ लागली आहेत. औद्योगिक क्रांतीचा हा एक अपरिहार्य परिणाम आहे. कनेरगावनाका परिसरात बाभूळ, साग, शिसव, सादोडा, धामोडी असे विविध प्रकारचे वृक्ष मोठ्या प्रमाणात होते. मात्र इमारतीचे बांधकाम, फर्निचर तसेच जळतनासाठी वृक्षतोड झाल्याने परिसर नाहीसा झाला आहे. विशेष म्हणजे या भागातून वाहणाऱ्या पैनगंगना नदीच्या काठावर असलेल्या कनेरगावनाका, पारडा परिसरात एके काळी धावंड्याची अनेक झाडे होती. या लाकडांचा उष्मांक चांगला असल्याने त्याचा सर्वाधिक वापर जळतनासाठी केला जातो. अशाप्रकारे बहुपयोगी ठरणारी वनसंपदा नष्ट होत आहे. तसेच सरकारी गायरान जमिनी शेतीसाठी वापरात आणल्या जात आहेत. त्यामुळे लाकूड मिळेनासे झाले. बहुसंख्य शेतकरी लोखंडी अवजारांकडे वळले असल्याने सुतारांच्या व्यवसायावर अवकळा आली आहे.