प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव मंत्रालयात इनवर्ड

By Admin | Updated: November 18, 2015 00:38 IST2015-11-18T00:28:54+5:302015-11-18T00:38:52+5:30

लातूर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता दिलेला आणि विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी शिफारस केलेल्या उजनी प्रकल्पातून

Inward to Ministry of Proposals for administrative approval | प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव मंत्रालयात इनवर्ड

प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव मंत्रालयात इनवर्ड


लातूर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता दिलेला आणि विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी शिफारस केलेल्या उजनी प्रकल्पातून पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव मंगळवारी मंत्रालयातील पाणीपुरवठा विभागात इनवर्ड करण्यात आला आहे़ लातूर मनपाच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी अशोक पिसाळ यांनी हा प्रस्ताव इनवर्ड केला आहे़ आता त्यावर प्रधान सचिवांची स्वाक्षरी झाल्यानंतर या योजनेच्या अंमलबजावणीला प्रारंभ होणार आहे़
उजनीहून लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी लातूर महापालिकेकडून ४३८२़४८ लाख रुपयांचा ढोबळ रकमेचा प्रस्ताव आता विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या शिफारशीनुसार राज्याच्या पाणीपुरवठा विभागात दाखल झाला आहे़ महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी अशोक पिसाळ यांच्या मार्फत हा प्रस्ताव विभागात इनवर्ड करण्यात आला आहे़ बुधवारी सकाळी ११ वाजता पिसाळ यांनी प्रस्ताव दाखल केला असून, आता या प्रस्तावाची संबंधित डेस्ककडून पडताळणी होणार आहे़ दरम्यान, बुधवारी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले मंत्रालयातच मिटींगच्या निमित्ताने उपस्थित होते़ जलयुक्त शिवार अभियानाच्या निमित्ताने मंत्रालयात बैठक होती़ त्या बैठकीला जिल्हाधिकारी गेले होते़ उजनीहून होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेच्या अनुषंगाने मात्र या बैठकीत चर्चा झाली नसल्याचे समजते़ जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्याने या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता दिली आहे़ शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाल्यानतर या योजनेचे काम होणार आहे़ त्यासाठीच मनपाने खास माणूस पाठवून प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांच्या कार्यालयात सादर केला आहे़ परंतु, यावर अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही़ किमान दोन-तीन दिवसांचा कालावधी प्रशासकीय मान्यता मिळायला लागेल, असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले़
प्रशासकीय मान्यतेपूर्वीच उस्मानाबाद नगरपालिका तसेच रेल्वेची नाहरकत, सार्वजनिक बांधकाम विभागाची नाहरकत प्रमाणपत्र मिळाले असल्याचे समजते़ केवळ प्रशासकीय मान्यतेसाठी हा प्रस्ताव रेंगाळला आहे़ उस्मानाबाद जिल्ह्यातील हातोला ते शिराढोणपर्यंत पाईपलाईन आणि उजनी ते उस्मानाबाद पर्यंत तीन पंप बदलणे ही कामे या योजनेत आहेत़ ४३ कोटी रुपयांचा यावर खर्च अपेक्षित आहे़ मात्र सध्या तरी हा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी मंत्रालयात सादर झाला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Inward to Ministry of Proposals for administrative approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.