छत्रपती संभाजीनगर : निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यास लाचखोरीच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर त्याच्या कार्यकाळातील शासकीय जमिनीची सर्वच प्रकरणे संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणांची स्वतंत्र चौकशी होणार आहे. त्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांच्या नेतृत्वाखाली दोन सदस्यीय समिती नियुक्त केली आहे.
जिल्ह्यात वर्ग-२ मध्ये असलेल्या गायरान जमिनी वर्ग-१ मध्ये करण्याचा सपाटा लाचेच्या जाळ्यात अडकलेले निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी लावला होता. ८८च्या आसपास प्रकरणे त्यांच्या काळात मंजूर केल्याची प्राथमिक माहिती असून, याप्रकरणी ‘लोकमत’ने २८ मेच्या अंकात वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी चौकशी समिती गठीत केली आहे.
तिसगाव येथील वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये रुपांतरित करण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी निवासी उपजिल्हाधिकारी खिरोळकर आणि महसूल सहाय्यक दीपक त्रिभुवन यास दि. २७ मे रोजी अटक झाली. या प्रकरणात वरील दोघांनी आधी २३ लाखांची रक्कम स्वीकारली होती. नंतर आणखी १८ लाखांची मागणी करून त्यातील पाच लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या दोघांना अटक केली. यानंतर आता खिरोळकर यांच्या कार्यकाळातील वर्ग : २ च्या सर्वच जमिनींचे तसेच गायरान जमिनींची प्रकरणे संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. खिरोळकर याच्या कार्यकाळात अशा पद्धतीने ८८ प्रकरणांना मंजुरी दिली गेल्याचे वृत्त आहे.
गायरानधारकाच्या निधनानंतर परस्पर निर्णयखिरोळकर याने गायरानधारकाच्या निधनानंतर परस्पर गायरान जमीन वर्ग २ मधून १ मध्ये मंजूर केली. तसेच त्या जमिनीचे खरेदीखतदेखील शहराऐवजी सिल्लोडमध्ये करण्यात आले. याप्रकरणी ॲड. प्रशांत नागरगोजे यांनी महसूल प्रशासनाला दि. २८ मे रोजी कायदेशीर नोटीस दिली आहे. माळीवाडा गट क्र.१९१ मधील वर्ग २ ची जमीन वर्ग: १ मध्ये करण्यात आली. खिरोळकर यांनी वस्तुस्थिती न पाहता हे प्रकरण हाताळले. जीपीएधारकाशी संगनमत करून त्यांनी निर्णय दिला.