महिला बाल रुग्णालयाच्या नूतनीकरणास मुहूर्त
By Admin | Updated: May 26, 2014 00:31 IST2014-05-25T23:54:41+5:302014-05-26T00:31:48+5:30
जालना : महिला व बाल रुग्णालयाच्या नूतनीकरणास अखेर मुहूर्त लागणार असून जूनच्या दुसर्या आठवड्यात कामाचा शुभारंभ होणार असल्याचे आ. कैलास गोरंट्याल यांनी सांगितले.

महिला बाल रुग्णालयाच्या नूतनीकरणास मुहूर्त
जालना : बहुप्रतिक्षित जिल्ह्यातील एकमेव जालना येथील महिला व बाल रुग्णालयाच्या नूतनीकरणास अखेर मुहूर्त लागणार असून जूनच्या दुसर्या आठवड्यात कामाचा शुभारंभ होणार असल्याचे आ. कैलास गोरंट्याल यांनी सांगितले. रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना आ. गोरंट्याल यांनी ही माहिती दिली. हे रुग्णालय दुमजली उभारण्यात येणार असून त्यासाठी ३५ कोटी ३६ लाखांच्या निधीस शासनाने मान्यता दिली आहे. रुग्णालयाच्या इमारतीबरोबरच डॉक्टर व कर्मचार्यांची निवासस्थाने, एक धर्मशाळाही उभारण्यात येणार असल्याचे आ. गोरंट्याल यांनी सांगितले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या प्रयत्नांमुळेच हा निधी मंजूर झाल्याचे ते म्हणाले. शहरातील महात्मा फुले मार्केटमधील नवीन संकुलाच्या कामाची संचिका प्रशासकीय स्तरावर मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. याबाबत आपण संबंधित अधिकार्यांची भेट घेऊन हे कामही लवकर सुरू व्हावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. गोरंट्याल म्हणाले. नगरपालिकेने गेल्या अडीच वर्षांच्या काळात प्रभावीपणे चांगली कामे केल्याने पालिकेस आयएसओ ९००१:२००८ प्रमाणपत्र मिळाले. ज्यामुळे आगामी काळात नवीन योजना अंमलात येऊ शकतील, असा विश्वास गोरंट्याल यांनी व्यक्त केला. शहरात ३० नवीन रस्त्यांची कामे पालिकेने हाती घेतली असून त्यापैकी काही पूर्ण झाली तर काही अंतिम टप्प्यात आहेत. १० जूनपर्यंत आणखी १४ रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा निर्णयही पालिकेने घेतला आहे. याशिवाय १० हायमॅक्स दिवे लावण्यात आले आहेत. सहा चौकांचे सुशोभिकरण होत असून त्यापैकी एकाचे काम पूर्ण झाले. पाणीपट्टीत तीन पटींनी वाढ एक वर्षापूर्वीच झालेली आहे. शहरासाठी महत्वाच्या असलेल्या जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेचा खर्च कसा काढायचा, यासाठी पाणीपट्टीचा पर्याय समोर आला होता. २००५-०६ मध्ये याविषयीचा ठराव पालिकेत सर्वसंमतीने घेण्यात आला होता, असेही ते म्हणाले. यावेळी प्रभारी नगराध्यक्ष राजेश राऊत, नगरसेविका पार्वताबाई रत्नपारखे, जगदीश भरतिया, मोहन इंगळे, राम सावंत यांची उपस्थिती होती.लोकसभा निवडणुकीच्या वेळी देशात लाट होती. त्यामुळे राज्यातही काँग्रेस आघाडीचे दिग्गज उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत अशा प्रकारची लाट राहणार नाही, असा विश्वास आ. गोरंट्याल यांनी व्यक्त केला. जालना शहरात अनेक सुविधा देण्याचा प्रयत्न नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आल्याचे आ. गोरंट्याल यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.