आंतरराज्य वाहतूक सुरळीत होणार
By Admin | Updated: September 25, 2014 00:52 IST2014-09-25T00:33:05+5:302014-09-25T00:52:18+5:30
जालना : गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला जालना-अंबड-वडीगोद्री या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामास प्रत्यक्षात प्रारंभ झाला आहे. ४६.०६ कि़मी. अंतराचे हे काम लवकरच पूर्ण होणार

आंतरराज्य वाहतूक सुरळीत होणार
जालना : गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला जालना-अंबड-वडीगोद्री या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामास प्रत्यक्षात प्रारंभ झाला आहे. ४६.०६ कि़मी. अंतराचे हे काम लवकरच पूर्ण होणार असल्याने या मार्गावरील तालुकास्थानांसह शेकडो खेड्यापाड्यांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
जालना-अंबड-वडीगोद्री हा रस्ता अरूंद असल्याने त्याचे चौपदरीकरणे होणे आवश्यक होते. पालकमंत्री राजेश टोपे यांनी शासन दरबारी या कामासाठी प्रयत्न सुरू केले होते. राज्य महामार्ग क्रमांक १७६ रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी ३१३.६५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सध्या दुपदरी रस्त्याच्या मध्य दुभाजकासह चौपदरीकरण करण्यात येणार आहे. जी.एस.बी. व खडीकरण डांबरीकरणासह मजबुतीकरण करण्यात येणार आहे.
अस्तित्वातील सर्व लहान पूल, स्लॅब, ड्रेन व नळकांडी पुलांचे चार पदरी मानक रूंदीकरण करण्यात येणार आहे. जंक्शन सुधारणा करणे, संरक्षण भिंत बांधणे, वृक्ष लागवड करणे ही कामेही केली जाणार आहेत.
याबाबत पालकमंत्री राजेश टोपे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, चौपदरीकरणामुळे जालना ते शहागड हे अंतर सुलभ होणार आहे.
त्याचा फायदा दळणवळणासाठी मोठ्या प्रमाणावर होणार आहे. या परिसरातील उद्योग, व्यवसाय वाढीस लागण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
जालना-अंबड-वडीगोद्री हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुपदरीच आहे. दिवसेंदिवस बीड, सोलापूर मार्गावरील वाहतूक वाढल्याने हा रस्ता अत्यंत अरुंद पडू लागला. चार वर्षांपूर्वी याच रस्त्यावर पारनेर पाटीजवळ शेगाव दिंडीतील ११ वारकऱ्यांचा भरधाव कंटेनरच्या धडकेने मृत्यू झाला होता. त्यानंतर पालकमंत्री टोपे यांनी शासन पातळीवर या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी प्रयत्न सुरू केले.
४या चौपदरीकरणाच्या कामामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न मार्गी लागणार असून दळणवळणाच्या सुविधांमध्ये वाढ होणार आहे.