स्वत:ऐवजी ‘डमी’ कर्मचारी ठेवून काम!
By Admin | Updated: February 3, 2015 01:00 IST2015-02-03T00:44:10+5:302015-02-03T01:00:55+5:30
औरंगाबाद : महावितरणच्या शहर आणि ग्रामीण भागात कर्मचारी स्वत: काम न करता परस्पर अप्रशिक्षित ‘तोतये’ कर्मचारी ठेवून काम करून घेत आहेत.

स्वत:ऐवजी ‘डमी’ कर्मचारी ठेवून काम!
औरंगाबाद : महावितरणच्या शहर आणि ग्रामीण भागात कर्मचारी स्वत: काम न करता परस्पर अप्रशिक्षित ‘तोतये’ कर्मचारी ठेवून काम करून घेत आहेत. त्यामुळे दुर्घटना होत असून, अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असे आ. प्रशांत बंब आणि नागरिकांनी जिल्हा विद्युतीकरण समितीच्या बैठकीत निदर्शनास आणून दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे कारवाई करू असे सांगितले.
यावेळी समिती अध्यक्ष खा. चंद्रकांत खैरे, आ. संदीपान भुमरे, महावितरणचे मुख्य अभियंता शंकर शिंदे आदींची उपस्थिती होती. ग्रामीण भागात अल्पवयीन मुलांकडून काम करून घेतले जात आहे. वाळूजमध्ये एका ‘सब’ कर्मचाऱ्याचा अपघात होऊन मृत्यू झाला; पण त्याचे गांभीर्य अधिकाऱ्यांना नाही, असा आरोप नागरिकांनी केला. नेहमीप्रमाणे अध्यक्षांनी पुन्हा रस्त्यावरील विद्युत खांब काढण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. शहरातील वीज ग्राहकांना बिले वाढवून आली आहेत, तक्रार सोडविण्यात येत नाही. सेवा मिळत नाही इ. तक्रारी केल्या. ग्रामीण भागात पाच तासांपेक्षा अधिक भारनियमन करण्यात येत आहे. ग्रामीण भागात रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांना एक-दोन महिन्यांनंतर रोहित्र दिले जात नाही. रोहित्र देताना ग्राहकांकडून कर्मचारी पैसे घेत आहेत, अशा तक्रारी मांडल्या.