बेफिकीर शाळांची होणार चौकशी !
By Admin | Updated: July 14, 2016 01:03 IST2016-07-14T00:46:03+5:302016-07-14T01:03:27+5:30
उस्मानाबाद : विद्यार्थ्यांना पोषण आहार देताना स्वच्छतेसोबतच अन्य बाबींची खबरदारी घेण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत.

बेफिकीर शाळांची होणार चौकशी !
उस्मानाबाद : विद्यार्थ्यांना पोषण आहार देताना स्वच्छतेसोबतच अन्य बाबींची खबरदारी घेण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत. एवढेच नाही, तर ही जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली होती.असे असतानाही अनेक शाळा याबाबत फारशा गंभीर नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले होते. या वृत्ताची दखल घेत बुधवारी शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी संबंधित शाळांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याकामी त्या-त्या तालुक्यांचे गटशिक्षण अधिकारी यांची नियुक्ती केली आहे.
मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. या योजनेमुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळतो आहे. पोषण आहार शिजविण्यासाठी शाळांमध्ये किचन शेड उभारण्यात आले आहेत. एकीकडे शाळांतून विद्यार्थ्यांना हात धुण्यापासून ते सर्व प्र्रकारच्या स्वच्छतेबाबत धडे दिले जातात. परंतु, आहार शिजविण्यासाठी अनेक शाळांमध्ये उभारण्यात आलेले किचनशेड अस्वच्छतेने माखले आहेत. पोषण आहार शिजविताना स्वच्छता पाण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून वारंवार सूचित केले जाते. एवढेच नाही, तर खारोखर स्वच्छता पाळली जाते की नाही हे पाहण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली आहे. शाळा सुरू होण्यापूर्वीच जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून संबंधित शाळांना किचनशेडमधील स्वच्छतेच्या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या होत्या. सुरूवातीलचे काही सूचनांचे पालनही केले. परंतु, हळूहळू त्याकडे कानोडळा होत गेला. याच अनुषंगाने मंगळवारी ‘लोकमत’च्या वतीने शाळांना भेटी देऊन परिस्थिती जाणून घेतली. यावेळी अनेक शाळांमध्ये विदारक चित्र नजरेस पडले.
वाशी तालुक्रूातील तेरखेडा येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळा परिसरात उभारण्यात आलेले किचनशेड पाहिल्यानंतर धक्कादायक बाब उजेडात आली. किचन शेडच्या दरवाजाची मोडतोड झाली आहे. त्यामुळे शाळा सुटल्यानंतर या चिकनशेडमध्ये कुत्रे आणि मांजरांचा वावर असतो. अशाच शेडमध्ये पोषण आहार शिजवून विद्यार्थ्यांना दिला जातो. याबाबत मुख्याध्यापकांना विचारल्यानंतर दुरूस्तीसाठी निधी नाही, असे सरळधोपट उत्तर मिळाले. शिक्षकांनी लक्ष न दिल्यास शिक्षण समितीने ही बाबा गांभीर्याने घेणे अपेक्षित होते. परंतु, या शाळेच्या बाबतीत तरी तसे झाल्याचे दिसत नाही. दरम्यान, लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूलसाठी पक्के किचनशेड नाही. त्यामुळे पत्र्यांच्या सहाय्याने शेड उभारण्यात आले आहे. त्याही स्वच्छता नाही. इंधन म्हणून वापरण्यात येणारी लाकडे अस्ताव्यस्थ पडली होती. तसेच फरशीही अर्धवटच होती. आणि शेडच्या कोपऱ्यांमध्ये उंदीर, घुशीने उकीर काढले आहेत. याच शेडमध्ये पोषण आहार शिजविण्याचे काम चालते.
दरम्यान, वारंवार आदेश देऊनही शाळा गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा प्रकार ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून समोर आल्यानंतर बुधवारी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी याची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. ही जबाबदारी त्या-त्या तालुक्यांचे गटशिक्षण अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. चौकशीअंती दोषी आढळून येणाऱ्या शाळांवर कारवाईचा बडगा उगाण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून प्रत्येक शाळेला वॉटर फिल्टर पुरविण्यात आले आहेत. यावर लोखांचा खर्च झाला आहे. परंतु, मंगळवारी शाळांना भेटी दिल्या असता, एकाही शाळेत फिल्टर दिसून आले नाही. त्यामुळे हे फिल्टर गेले कुणीकडे? असा सवाल आता खुद्द पालकांतून विचारला जावू लागला आहे. ही बाबही जिल्हा परिषद शिक्षण विभागाने गांभीर्याने घेण्याची गरज व्यकत होत आहे.
४शाळा सुरू होण्यापूर्वीच सर्व शाळांना पोषण आहार शिजविताना आवश्यक खबरदारी घेण्याबाबत आदेशित केले आहे. तसेच पत्रही दिले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक बैैठकीतही सूचना केल्या जातात. असे असतानाही काही शाळांकडून निकषांचे पालन केले जात नाही. त्यामुळे संबंधित शाळांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकषीतून दोषी आढळून येणाऱ्या शाळांवर कारवाई केली जाईल, असे जगताप यांनी सांगितले.