इन्फ्रा दोनचे काम कासवगतीने सुुरू
By Admin | Updated: July 28, 2015 01:17 IST2015-07-28T00:41:44+5:302015-07-28T01:17:53+5:30
औरंगाबाद : महावितरण परिमंडळात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी जवळपास साडेतीनशे कोटी रुपयांची कामे करीत आहे; पण हे काम कासवगतीने सुरू असल्यामुळे अद्यापही अनेक ग्राहक

इन्फ्रा दोनचे काम कासवगतीने सुुरू
औरंगाबाद : महावितरण परिमंडळात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी जवळपास साडेतीनशे कोटी रुपयांची कामे करीत आहे; पण हे काम कासवगतीने सुरू असल्यामुळे अद्यापही अनेक ग्राहक सेवेपासून कोसोदूर आहेत. त्यामुळे इन्फ्रा दोनच्या कामांची गती वाढवावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.
ग्राहकांची वाढती संख्या व विजेच्या मागणीमुळे कंपनीला सेवा-सुविधा देताना अनेक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. परिमंडळातील अनेक भागांत अद्यापही विद्युत लाईन न टाकल्यामुळे शेतकरी आणि नागरिक वीजजोडणीपासून कोसोदूर आहेत. ग्राहकांना सेवा आणि सुविधा देता यावी म्हणून पायाभूत आराखडा दोन (इन्फ्रा-२) मध्ये औरंगाबाद शहर - ग्रामीण आणि जालना जिल्ह्यात ३४८ कोटी ४७ लाख रुपयांचे काम करण्यात येणार आहे. त्यामध्ये औरंगाबाद विभागात ११ सब-स्टेशन, कन्नड- ९ तर जालन्यामध्ये ९ सब-स्टेशन उभारण्यात येणार आहेत. परिमंडळात हायटेन्सेनची १ हजार ८१४ कि़ मी.ची लाईन टाकण्यात येणार आहे. तर भूमिगत हायटेन्सेनची लाईन ५ कि. मी. टाकण्यात येणार आहे. एल.टी. लाईन २०५२ कि़ मी. टाकण्यात येणार आहे. त्यामध्ये औरंगाबाद विभागात २५० कि़मी., कन्नड-३४० कि़ मी., जालना जिल्ह्यात १४५२ कि़ मी. लाईनचा समावेश आहे. परिमंडळात २,८७३ नवीन रोहित्र बसविण्यात येणार आहेत. २०५२ रोहित्रांची क्षमता वाढविण्यात येणार आहे. (६३ केव्ही रोहित्रांच्या ठिकाणी १०० केव्हीचे रोहित्र बसविण्यात येणार आहेत.) या साडेतीनशे कोटींच्या कामांपैकी बहुतांशी कामे सुरू करण्यात आलेली आहेत; पण हे काम कासवगतीने सुरू असल्यामुळे त्याचा फटका कंपनी आणि ग्राहकांना बसत आहे. शेतात आणि वाड्या- वस्त्यांमध्ये विद्युत लाईन नसल्यामुळे आजही अनेक ग्राहक वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. जोडणी मिळत नसल्यामुळे नागरिक आकडा टाकून वीज घेतात. त्यामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे.