अमरनाथ यात्रेत अनंत अडचणी
By Admin | Updated: July 13, 2017 01:04 IST2017-07-13T00:55:22+5:302017-07-13T01:04:46+5:30
औरंगाबाद : दहशतवादी हल्ल्याला न घाबरता यात्रेकरू त्यापेक्षा अधिक जल्लोषात अमरनाथ यात्रेसाठी पुढे निघाले आहेत

अमरनाथ यात्रेत अनंत अडचणी
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दहशतवादी हल्ल्याला न घाबरता यात्रेकरू त्यापेक्षा अधिक जल्लोषात अमरनाथ यात्रेसाठी पुढे निघाले आहेत. यात औरंगाबादच नव्हे, तर आसपासच्या जिल्ह्यातील दीड हजार भाविकांचा समावेश आहे; मात्र या यात्रेकरूंना आता नैसर्गिक संकटाचाही सामना करावा लागत आहे. बुधवारी सकाळी रामबाण ते बनिहाल या मार्गावर ठिकठिकाणी दरडी कोसळल्या. यामुळे घाटावर एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली होती. औरंगाबाद व वैजापूर येथील पाच यात्रेकरूंच्या जीपसमोरील काही अंतरावरच दरड कोसळली होती. सर्वजणसुखरूप असल्याची माहिती या यात्रेकरूंनी मोबाइलवरून ‘लोकमत’ला दिली.
अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या यात्रेसाठी औरंगाबाद व आसपासच्या जिल्ह्यातील २३३० यात्रेकरूंनी नोंदणी केली आहे. यातील दीड हजार भाविक सध्या जम्मू-काश्मीरमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. वेगवेगळ्या पथकांत भाविक विखुरलेले आहेत. त्यातील काही भाविकांशी आमच्या प्रतिनिधीने मोबाइलवरून संपर्क साधला असता धावणी मोहल्ल्यात राहणारा युवराज झाला हा युवकाने मोबाइलवर सांगितले की, अनंतनाग जिल्ह्यातून अमरनाथकडे जाण्यासाठी आज सकाळी ६ वाजता ते
निघाले होते.
सकाळी १०.३० ते ११ वाजेदरम्यान रामबाण ते बनिहाल या मार्गावर जागोजागी दरडी कोसळल्या. आम्ही (जीकेएएक्स ३६४९) या गाडीमध्ये आहोत.
स्पीडब्रेकरमुळे गाडीची गती कमी झाली आणि आमच्यापासून सुमारे २० ते २५ मीटर अंतरावर दरड कोसळली. गाडीचा वेग कमी झाल्याने आम्ही वाचलो. युवराजसोबत वैजापूर तालुक्यातील एम.एस. उगले, सीताराम ठोंबरे, जयेंद्र निंबाळकर, ताराचंद पहाडे हे यात्रेकरू आहेत. दरड बाजूला काढण्याचे काम सैनिक युद्धपातळीवर करीत आहेत.
दरड कोसळल्यामुळे अमरनाथकडे जाणाऱ्या वाहनांना थांबविण्यात आले आहे. फक्त अमरनाथकडून दर्शन घेऊन येणाऱ्या यात्रेकरूंच्या वाहनांना जम्मूकडे पाठविले जात आहे. घाटात एकेरी मार्ग सुरू आहे. युवराजने सांगितले की, आमच्या पाठीमागे सुमारे ३०० पेक्षा अधिक वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. जिथे थांबले तिथे कसलीही सुविधा नसल्याने अनंत अडचणी येत आहेत. यात्रेकरूंनी घरून आणलेल्या दशम्या खाऊन दिवस काढला. नियोजित कार्यक्रमानुसार आम्ही ११ जुलै रोजी अमरनाथ बाबा बर्फानीचे दर्शन घेणार होतो; पण दहशतवादी हल्ला व दरड कोसळल्याने आता शुक्रवारी १४ रोजी सायंकाळी आम्हाला शिवलिंगाचे दर्शन होईल.