उद्योगांना बसला फटका

By Admin | Updated: November 16, 2014 00:06 IST2014-11-16T00:06:25+5:302014-11-16T00:06:25+5:30

वाळूज महानगर : जीटीएलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी १४ नोव्हेंबरला रात्रीपासून वाळूज औद्योगिकनगरी, बजाजनगरातील वीजपुरवठा खंडित केला.

Industry hits bus | उद्योगांना बसला फटका

उद्योगांना बसला फटका

वाळूज महानगर : जीटीएलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी १४ नोव्हेंबरला रात्रीपासून वाळूज औद्योगिकनगरी, बजाजनगरातील वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर लगेच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत होत नसल्यामुळे औद्योगिकनगरीत काळोख पसरला होता. या लाईट बंदमुळे कोट्यवधींचे नुकसान झाले.
औद्योगिक क्षेत्रातील वीजपुरवठा रात्री ११ वाजेनंतर खंडित झाल्यामुळे बहुतांश कारखान्यांतील कामकाज ठप्प पडले होते. विजेअभावी कारखान्यांतील मशिनरी बंद पडल्यामुळे उत्पादन प्रकियाही थांबल्यामुळे उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप औद्योगिक संघटनांनी केला. वीजपुरवठा बंद झाल्यामुळे आज पहिल्या शिफ्टमध्ये कामावर हजर झालेले कामगार दिवसभर बसून होते.
सकाळपर्यंत वीजपुरवठा सुरू न झाल्यामुळे संतापलेल्या उद्योजक व ग्राहकांनी जीटीएल कार्यालयाकडे मोर्चा वळविला. या ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला. संतापलेल्या ग्राहकांनी कर्मचाऱ्यांना धारेवर धरताच त्यांनी धूम ठोकली. यावेळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा लवकर सुरू होईल, असे आश्वासन दिल्याने उद्योजक आणि नागरिकांनी माघार घेतली. उद्योजकांची गैरसोय लक्षात घेऊन मुख्य अभियंता शंकर शिंदे यांनी औद्योगिक क्षेत्रात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी एक कार्यकारी व दोन कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती केली. दुपारनंतर वीजपुरवठा सुरू झाल्यामुळे दुसऱ्या शिफ्टपासून कामकाज सुरू झाले.

Web Title: Industry hits bus