उद्योगांना पाणी मिळेना !
By Admin | Updated: February 3, 2015 00:57 IST2015-02-03T00:29:45+5:302015-02-03T00:57:54+5:30
संजय कुलकर्णी , जालना स्टील उद्योगाचे जाळे देशभर पसरविणाऱ्या शहरातील औद्योगिक वसाहतीला उद्योगासाठी शेंद्रा-जालना ही स्वतंत्र पाणीपुरवठा करून देखील नियमित पाणी मिळत

उद्योगांना पाणी मिळेना !
संजय कुलकर्णी , जालना
स्टील उद्योगाचे जाळे देशभर पसरविणाऱ्या शहरातील औद्योगिक वसाहतीला उद्योगासाठी शेंद्रा-जालना ही स्वतंत्र पाणीपुरवठा करून देखील नियमित पाणी मिळत नसल्याने त्याचा उद्योजकांना त्रास सहन करावा लागत आहे.
अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत छोटे-मोठे सुमारे १५० उद्योग आहेत. मात्र त्यापैकी सर्वसाधारणपणे १०० कारखाने सुरू असून त्यात सर्वाधिक ५५ कारखाने स्टील उद्योगाचे आहेत. या उद्योगाला पाणी मिळावे, यासाठी शेंद्रा-जालना या पाणीपुरवठा योजनेची निर्मिती झाली. किमान २ एम.एल.डी. पाणी या योजनेतून दररोज अपेक्षित आहे. परंतु ज्यावेळी पाणीपुरवठा होतो, त्यावेळी एक किंवा सव्वा एमएलडी पाणी येते. नियमित पाणीपुरवठा होत नाही, त्यामुळे उद्योजकांना पाणी विकत घ्यावे लागते, ही वस्तुस्थिती आहे.
ऐन उन्हाळ्याच्या काळात उद्योजकांची मोठी अडचण होते. कारण एकतर या काळात पाणी अधिक लागते. विकतचे पाणी देखील लवकर मिळत नाही. या योजनेद्वारे पाणी केव्हा मिळेल, हे निश्चित नाही. अनेकवेळा तांत्रिक कारणांमुळे पाणीपुरवठा होत नाही. छोट्या उद्योगांना तर अनेकवेळा उद्योग बंद ठेवावे लागतात.
गेल्या महिनाभरापासून या उद्योगांना पाणी मिळेल किंवा नाही, याची शाश्वती नाही. पाणी आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा येते, अशी स्थिती आहे. त्यामुळे उद्योजकांसमोर मंदी, वीज दरवाढीपाठोपाठ आता पाणीटंचाईचे नवे संकट उभे राहिले आहे.
औद्योगिक विकास महामंडळाचे कनिष्ठ अभियंता अजय किंगरे म्हणाले, शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील मुख्य व्हॉलच्या नादुरूस्तीमुळे अनिमियत पाणीपुरवठा होत आहे. ५ ते ७ दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. २ एमएलडी पाणी मिळणे अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्षात त्यापेक्षा कमी पाणी येते. त्यामुळे उद्योगांना पाणी मिळत नाही.
मंदी आणि वीज दरवाढ यामुळे अगोदरच कारखानदार अडचणीत सापडले आहेत. सुमारे ४० स्टील कारखान्यांमध्ये केवळ रात्रपाळीतच काम सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून असंख्य कामगार आपल्या गावी निघून गेले असून उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. नेहमी गजबजलेला अतिरिक्त औद्योगिक वसाहतीच्या परिसरात आता शुकशुकाट निर्माण झाला आहे.
याबाबत किशोर अग्रवाल म्हणाले, आमच्या उद्योगांना नियमित पाणी मिळत नाही. त्यामुळे आम्हाला पाणी विकतच घ्यावे लागते. येथील उद्योगांसाठी किमान ३ एमएलडी पाणी दररोज लागते. परंतु अनेकवेळा तांत्रिक अडचणींमुळे पाणी आले नसल्याचे सांगण्यात येते.
४सतीश अग्रवाल म्हणाले, शेंद्रा-जालना योजनेतून महिन्यातून एकदा पाणी येते. पाण्याच्या सुविधेसाठी स्वतंत्र योजना केलेली असताना पाण्याविना उद्योगांची मोठी अडचण होत आहे. आम्हाला विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.