जिल्ह्याचे निर्बंध शिथिल होण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:05 IST2021-07-29T04:05:06+5:302021-07-29T04:05:06+5:30

औरंगाबाद: जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असल्यामुळे जिल्ह्यातील लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होण्याचे संकेत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले ...

Indications of relaxation of district restrictions | जिल्ह्याचे निर्बंध शिथिल होण्याचे संकेत

जिल्ह्याचे निर्बंध शिथिल होण्याचे संकेत

औरंगाबाद: जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असल्यामुळे जिल्ह्यातील लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होण्याचे संकेत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. शासनाच्या १४ जिल्ह्यांच्या यादीत औरंगाबादचे नाव असणारच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लॉकडाऊनच्या मर्यादा शिथिल होतील, असेही चव्हाण म्हणाले.

लॉकडाऊनचे निर्बंध हटवा, अशी व्यापाऱ्यांचीदेखील मागणी आहे. त्यातच शासनाने बुधवारी १४ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याबाबत सूतोवाच केले. त्यामुळे औरंगाबादमध्ये काय सवलती मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसह डेल्टा प्लस या विषाणू संसर्गाची चाहूल लागल्यामुळे शासनाच्या आदेशानुसार जिल्हा २८ जूनपासून लॉकडाऊन निर्बंधातील तिसऱ्या स्तरात आहे. जिल्ह्यात मिनी लॉकडाऊन सुरू आहे. २९ जूनपासून सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत व्यवहाराला सध्या परवानगी आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमाव आणि नंतर सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी आहे. शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही १०० टक्के बंद आहे.

तिसऱ्या टप्प्यात शहर-जिल्ह्याचा समावेश झाल्यापासून मॉल्स, नाट्यगृहे, चित्रपटगृहे पूर्णत: बंद आहेत. रेस्टॉरंट, हॉटेल्स, खानावळी, शिवभोजन थाळी केंद्र सोमवार ते शुक्रवार ५० टक्के डायनिंग क्षमतेने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू आहे. शनिवार, रविवार फक्त पार्सल सुविधा सुरू आहे.

१४ जिल्ह्यांच्या यादीत औरंगाबादचा समावेश झाल्यास वरील सर्व वेळांमध्ये काही प्रमाणात शिथिलता मिळण्याची शक्यता आहे.

व्यापाऱ्यांचीही मागणी

मागील काही दिवसांत जिल्ह्यातील व्यापार तसेच सर्वच क्षेत्रातील लॉकडाऊनचे निर्बंध उठवावेत, अशी मागणी जिल्हा व्यापारी महासंघ तसेच विविध आस्थापनांकडून होत आहे. त्याला सरकार आणि जिल्हाधिकारी कसा प्रतिसाद देतात, याची व्यापाऱ्यांनाही प्रतीक्षा आहे.

सध्याचे निर्बंध असे आहेत

सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत व्यापारास मुभा आहे.

शनिवार आणि रविवार १०० टक्के लॉकडाऊन आहे.

हॉटेल्समधील रात्रीचे डायनिंग बंद आहे.

अशी मिळू शकते सूट

दुकानांना सायंकाळी ८ वाजेपर्यंत मुभा मिळू शकते.

शनिवार, रविवारचे १०० टक्के लॉकडाऊन मागे घेणे शक्य.

हॉटेल्सना रात्री ८ वाजेपर्यंत डायनिंगची सवलत मिळणे शक्य.

Web Title: Indications of relaxation of district restrictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.