स्वातंत्र्य ७५ वर्षांचे झाले, पण जात, धार्मिक अन् महिलांची गुलामी केव्हा संपणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:02 IST2021-08-23T04:02:16+5:302021-08-23T04:02:16+5:30
औरंगाबाद : भारतीय स्वातंत्र्याने ७४ वर्ष पूर्ण करीत ७५व्या वर्षात पदार्पण केले. या कालखंडात आपण मोठी प्रगती केली. ...

स्वातंत्र्य ७५ वर्षांचे झाले, पण जात, धार्मिक अन् महिलांची गुलामी केव्हा संपणार?
औरंगाबाद : भारतीय स्वातंत्र्याने ७४ वर्ष पूर्ण करीत ७५व्या वर्षात पदार्पण केले. या कालखंडात आपण मोठी प्रगती केली. पण आजही जात, धर्म आणि महिलांना स्वातंत्र्य देण्यासाठी आंदोलने करावी लागतात, मोर्चे काढावे लागतात. या वर्गांची गुलामी केव्हा संपणार? असा सवाल मान्यवर कवींनी कवितांच्या माध्यमातून उपस्थित केला. यावर डॉ. प्रतिभा अहिरे यांनी 'पंख पसरीन म्हणते निळ्या नभात मी, रंग उधळीन या आसंमतात मी, उघड तु पिंजरा, दोस्त हो ना खरा, श्वास घेण्यास अवकाश दे ना जरा' अशी कविता सादर करीत महिलांच्या स्वातंत्र्याची मागणीच केली.
लोकसंवाद फाऊंडेशनतर्फे 'कविता स्वातंत्र्या'ची या विषयावर निमंत्रित कवींचे संमेलन रविवारी (दि. २२) सकाळी ११ वाजता ऑनलाईन आयोजित केले होते. प्रसिद्ध कवयित्री डॉ. प्रतिभा अहिरे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होत्या. मुंबईतील प्रसिद्ध कवी दामोदर मोरे यांनी 'मेरी प्यारी आजादी तु कितनी सुंदर, सुंदर सुख का समंदर, लेकीन कहा है तु, ऐसा सुना है की तु आई है, ऐसा पढा है की तु की आई है, मैने तो कभी देखा नही तुझे. प्रिय आजादी तु सोती रही जमींदार और अमिरों की मखमली शैय्या पर, हम तडपते रहे करवटे बदलते रहे ७५ साल तेरे सपनो के घोडे पर सवार हो के....' या कवितेने संमेलनाची सुरुवात केली. पुण्यातील दामोदर खडसे यांनी ' मै ने गोल्ड मेडल के साथ डिग्रीया लिई, मेरे देशने मुझे आधी पगार पर ----मास्रीट--- दिई, फिर मैने युनिर्व्हसिटी बंद करवाने की लिडरी की, मेरे देश ने मुझे एज्युकेशन मिनिस्टरी दी' ही कविता सादर करीत रसिकांची दाद मिळवली. बुलडाणा येथील अजिम नवाज राही, उत्तरप्रदेशातील प्रा. हरिश गौतम यांच्या विषमता दाखविणाऱ्या कवितांना उत्तम प्रतिसाद मिळाला. डॉ. अरुण रसाळ यांनी स्वच्छतेच्या कविता सादर केल्या. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी प्रा. रवी कोरडे यांनी 'ती होते माहेरच्या दिव्यातली तेल वात' ही महिलांच्या व्यथा मांडणारी कविता सादर केली. डॉ. जिजा शिंदे यांनी 'माय' कविता सादर केली. याशिवाय परभणीचे केशव खटिंग, परळीचे अरुण पवार, पेण येथील विनायक पवार, चाळीसगावचे डॉ. विरा राठोड आणि लोहा येथील संजय बालाघाटे यांनी कविसंमेलनात सहभागी होत बहारदार कवितांचे सादरीकरण केले. डॉ. हंसराज जाधव यांनी प्रास्ताविक केले. बहरदार सूत्रसंचालन करताना डॉ. समाधान इंगळे यांनीही अनेक कविता सादर केल्या. कॅप्टन डॉ. अर्जुन मोरे यांनी आभार मानले.
चौकट,
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ७५ कार्यक्रमांनी साजरा
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशाने केलेल्या प्रगतीचा आढावा विविध ७५ कार्यक्रमांच्या माध्यमातून घेतला जाणार असल्याची माहिती लोकसंवाद फाऊंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. हंसराज जाधव यांनी यावेळी प्रास्ताविकात दिली. यात विविध मान्यवर व्यक्तिंना आमंत्रित केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.