सिंचनक्षेत्र वाढवून जिल्हा टंचाईमुक्त करणार
By Admin | Updated: April 27, 2015 00:57 IST2015-04-27T00:43:54+5:302015-04-27T00:57:13+5:30
जालना : राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जालना जिल्हा सिंचनाच्या बाबतीत अतिमागासलेला आहे. जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र वाढवून जिल्हा टंचाईमुक्त करण्यासाठी

सिंचनक्षेत्र वाढवून जिल्हा टंचाईमुक्त करणार
जालना : राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जालना जिल्हा सिंचनाच्या बाबतीत अतिमागासलेला आहे. जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र वाढवून जिल्हा टंचाईमुक्त करण्यासाठी शिरपूर पद्धतीचे बंधारे अतिशय उपयुक्त ठरणार आहे. पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवणे शक्य होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
कुंडलिका नदीवर घाणेवाडी जलाशयाच्या खालील बाजूस शिरपूर पद्धतीचे साखळी बंधारे बांधण्याच्या कार्यक्रमाचे भूमिपूजन लोणीकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. अर्जुनराव खोतकर, आ. विक्रम काळे, नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, सिद्धिविनायक न्यास प्रभादेवी मुंबईचे अध्यक्ष नरेंद्र राणे, ट्रस्टी हरीश ससन, न्यासचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश शिंदे, शिरपूर पॅटर्नचे प्रणेते सुरेश खानापूरकर, घाणेवाडी जलसंरक्षण मंचचे अध्यक्ष रमेशभाई पटेल, सुनीलभाई रायठठ्ठा, भाऊसाहेब घुगे, माजी आमदार अरविंदराव चव्हाण, दिलीप तौर, विलास नाईक, माजी नगरसेविका कमल तुल्ले यांची उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री लोणीकर पुढे म्हणाले की, मराठवाड्यात एक हजार फुटापर्यंत पाणी पातळी खोल गेलेली आहे. जनतेला टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात नद्यांची संख्या आहे. परंतु पाणी न अडवल्यामुळे हे पाणी इतर राज्यात वाहून जाते. पडणाऱ्या पावसाचे पाणी या नद्यांमध्ये अडविल्यास राज्यात पाण्याची टंचाई जाणवणार नाही. संपूर्ण राज्य टंचाईमुक्त करण्यासाठी राज्य शासन जलयुक्त शिवार अभियान राबवित आहे. जालना जिल्ह्यातील जवळपास २१२ गावांमधून या अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे हाती घेण्यात आली असून लोकसहभागातून हे अभियान राबवून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवून यावर्षात ५०० गावे टंचाईमुक्त करण्याचा निर्धार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांच्या शेताला पाणी मिळाले नाही तर त्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, तसेच उद्योग धंद्यांना पाणी मिळाले तरच उद्योगधंदे वाढीस लागून बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून जिल्ह्याच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेल. जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे एक दिवसाचे वेतन जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमास देण्याचे आवाहन करून लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा त्यांचे एक दिवसाचे वेतन द्यावे, असे आवाहन पालकमंत्री लोणीकर यांनी केले. उद्योगपतींनी एक-एक गाव दत्तक घ्यावे, असेही ते म्हणाले.
सिद्धिविनायक न्यास प्रभादेवी मुंबई यांच्यामार्फत संपूर्ण राज्यात जनकल्याणासाठी मदत देण्यात येते. जिल्ह्याच्या सिंचनक्षेत्र वाढीसाठी जवळपास ९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री लोणीकर यांनी न्यासचे आभार व्यक्त केले.
यावेळी आ. खोतकर म्हणाले की, जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र अत्यल्प आहे. पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी पडणाऱ्या पावसाचा थेंब जमिनीत जिरवण्याबरोबरच तो नद्यांच्या माध्यमातून अडविणे आवश्यक आहे. शिरपूर पद्धतीच्या बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्याची गुणवत्ता उत्तम दर्जाची असणे आवश्यक असल्याचे सांगून याकामी अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष द्यावे. सिद्धिविनायक ट्रस्टने उपलब्ध करून दिलेला निधी जनतेच्या कल्याणासाठी खर्च व्हावा, अशी अपेक्षा खोतकर यांनी व्यक्त केली.
यावेळी रमेशभाई पटेल, सुनीलभाई रायठठ्ठा, नरेंद्र राणे, सुरेश खानापूरकर यांचीही समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविक लघुसिंचन उपविभाग अंबडचे उपविभागीय अभियंता आ.अ. कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश केसापूरकर यांनी केले. तर उपजिल्हाधिकारी डॉ. एन.आर. शेळके यांनी आभार मानले.
यावेळी नेपाळ येथे झालेल्या भूकंपामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमास तहसीलदार रेवननाथ लबडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे, जिल्हा कृषी अधिकारी आनंद गंजेवार, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता र.प. मेश्राम, अधीक्षक अभियंता सु.ह. खरात, सुनील आर्दड, जगदीश नागरे, सतीश अकोलकर, सागर बर्दापुरकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जिल्हाधिकारी नायक यावेळी म्हणाले की, कुंडलिका नदीवर घाणेवाडी जलाशयाच्या खालील बाजूस बांधण्यात येणाऱ्या शिरपूर पद्धतीचे साखळी बंधाऱ्याची गुणवत्ता उत्तम दर्जाची राहील, यासाठी जातीने लक्ष देण्यात येईल. तसेच सिद्धिविनायक न्यास, प्रभादेवी मुंबई यांच्यामार्फत संपूर्ण राज्यामध्ये जनतेला आरोग्य सुविधा तसेच शिक्षण सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येतो.
४जालना जिल्ह्यात सुद्धा नागरिकांना अधिकाधिक चांगल्या आरोग्य सेवा तसेच शिक्षण सुविधा पुरविण्यासाठी निधी मागणीचा प्रस्ताव तयार करून सादर करण्यात येईल, असेही यावेळी ते म्हणाले.