अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटात

By Admin | Updated: March 3, 2015 00:30 IST2015-03-03T00:23:22+5:302015-03-03T00:30:10+5:30

गणेश खेडकर , औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजून खरीप पिकांच्या नुकसानीचे अनुदान वाटप झालेले नाही तोच रबीही हातची जाण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. सतत येणाऱ्या

Inadequate rainfall causes the victims to suffer | अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटात

अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटात


गणेश खेडकर , औरंगाबाद
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजून खरीप पिकांच्या नुकसानीचे अनुदान वाटप झालेले नाही तोच रबीही हातची जाण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. सतत येणाऱ्या या अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे बळीराजा देशोधडीला लागला आहे. शनिवारी रात्री सुरू झालेला पाऊस रविवारी दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू होता. काही भागांमध्ये रविवारी रात्रीही या बेमोसमी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
खरीप पिके हातची गेली म्हणून शासनाने दुष्काळी अनुदान जाहीर केले. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात याचे वाटप अतिशय संथगतीने सुरू आहे.जिल्ह्यात तब्बल ३५ कोटींचे दुष्काळी अनुदान अजून वाटप झालेले नाही. औरंगाबाद तालुक्याला २४ कोटी ६ लाख १८ हजार ३३६ रुपये मिळाले. त्यापैकी गेल्या आठवड्यापर्यंत १५ कोटी ९६ लाख ३२ हजार ४५५ रुपये वाटप झाले होते.
कन्नड तालुक्यात ७५ हजार १८६ अल्पभूधारक शेतकरी असून ११ हजार ८७६ बहुभूधारक शेतकऱ्यांची संख्या आहे. या तालुक्याने ३७ कोटींची मागणी केली असून, आतापर्यंत २९ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यापैकी २२ कोटींचे वाटप झाले, तर ७ कोटी शिल्लक आहेत. ४९ हजार ७५५ शेतकऱ्यांना आतापर्यंत पैसे वाटप झाले आहेत. म्हणजे अजूनही २५ हजार शेतकऱ्यांना निधीचे वाटप झालेले नाही.
सिल्लोड तालुक्यात एकूण ७४ हजार शेतकरी आहेत. आतापर्यंत २७ कोटींचे अनुदान आले. त्यापैकी ५५ हजार शेतकऱ्यांना २५ कोटी ५० लाख रुपये वाटप झाले आहेत. सोमवारी एक कोटी वाटप करण्यात येतील. उर्वरित रक्कम मंगळवारी वाटप केली जाईल, असे तहसीलदार राहुल गायकवाड यांनी सांगितले.
सोयगाव तालुक्यात जवळपास एक हजार शेतकऱ्यांना अजून अनुदानाचा छदामही मिळालेला नाही. सोयगावच्या तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांनी फटकारल्यानंतरही सर्व शेतकऱ्यांच्या याद्या अजूनही अपडेट झालेल्या नाहीत. येथे दीड ते दोन कोटी रुपये पडून आहेत.
पैठण तालुक्याला आतापर्यंत ३८ कोटी ११ लाख १४ हजार ७९६ रुपये अनुदान मिळाले असून, ३३ कोटी रुपये वाटप करण्यात आले. येथे अजून ५ कोटी रुपयांचा निधी पडून आहे.

Web Title: Inadequate rainfall causes the victims to suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.