अपुऱ्या बसेस, खराब रस्ते पथ्यावर !
By Admin | Updated: August 2, 2014 01:37 IST2014-08-02T00:49:46+5:302014-08-02T01:37:37+5:30
वाशी : तालुक्यात अवैध प्रवाशी वाहतूक बोकाळली असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. आजही अनेक गावांमध्ये महामंडळाची एसटी पाहोंचलेली नाही.

अपुऱ्या बसेस, खराब रस्ते पथ्यावर !
वाशी : तालुक्यात अवैध प्रवाशी वाहतूक बोकाळली असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. आजही अनेक गावांमध्ये महामंडळाची एसटी पाहोंचलेली नाही. त्यामुळे अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांचे चांगलेच फावत आहे. या संधीचा फायदा घेत वाहनधारकही मर्यादेपेक्षा जास्त प्रवाशी बसवित आहेत.
वाशी तालुक्यातून औरंगाबाद-सोलापूर महामार्ग गेलेला असून या मार्गपासून चार किलोमिटर अंतरावर वाशी हे तालुक्याचे गाव आहे. तालुक्यात मांडवा, दसमेगाव मार्गे कळंब आगाराच्या अनेक बसेस आहेत. मात्र त्यांचे वेळापत्रक हे प्रवाशांच्या सोयीचे नाही. त्यामुळे बहुतांश बसेस या रिकाम्या धावत आहेत. याचा फटका सहाजिकच उत्पन्नावर होत आहे. अप्रत्यक्षपणे याचा फायदा खाजगी वाहनधारकांना होत आहे. कळंब व भूम आगाराच्या अनेक बसेस खराब झाल्या आहेत. अनेवेळा अशा बसेस रस्त्यातच बंद पडत आहेत. अशा कटकटीला वैतागून प्रवाशी खाजगी वाहनांचा आधार घेत आहेत. उस्मानाबाद ते वाशी ही बस चोराखळी मार्ग सोडल्यामुळे या गाडीला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद लाभत नाही. त्यामुळे बहुतांश प्रवाशी वाशी ते येरमाळा हा प्रवास खाजगी वाहनांनी करताना दिसतात. (वार्ताहर)
...तर एसटीचा फायदाच
औरंगाबाद-सोलापूर या महामार्गावरून धावणाऱ्या सर्व बसेस जर वाशी इंदापूर मार्गे सोडण्यात आल्या तर अंतरही कमी होईल. तसेच इंदापूर आणि वाशी हे दोन मोठे थांबेही मिळतील. त्यामुळे उत्पन्नामध्येही वाढ होईल. आणि अवैध वाहतुकीला आळाही बसण्यास मदत होईल, असे जाणकार सांगतात.
खड्डेमय रस्त्यांचे निमित्त
ग्रामीण भागात लांब पल्ल्याच्या बसेस सोडल्यानंतर काही दिवस सुरळीत चालतात. परंतु, कालांतराने अनियमितता येते. बहुतांश चालकांकडून रस्ते खराब असल्याचे कारन पुढे केले जाते. हे खराब रस्तेही अवैध वाहतूकदारांच्या पथ्यावर पडत आहेत.
प्रशासनाचा आशीर्वाद..!
वाशी ते कळंब, वाशी ते पारा, वाशी ते येरमाळा, पार्डी, सरमकुंडी, भूम आदी ठिकाणी पोलिसांच्या आशीर्वादानेच अवैध प्रवाशी वाहतूक होत आहे, असा आरोप ग्रामस्थांतून केला जात आहे. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी वेळेत बसेस सोडल्यास अवैध प्रवाशी वाहतूक कमी होईल.