पदाधिकाऱ्यांवर निष्क्रियतेचा ठपका
By Admin | Updated: December 9, 2014 01:01 IST2014-12-09T00:49:00+5:302014-12-09T01:01:38+5:30
औरंगाबाद : महापालिकेत पदाधिकारी उपलब्ध होत नाहीत. अधिकारी तर पदाधिकारी आणि नगरसेवकांना दाद देत नाहीत. निवडणुका तोंडावर आल्या आहेत

पदाधिकाऱ्यांवर निष्क्रियतेचा ठपका
औरंगाबाद : महापालिकेत पदाधिकारी उपलब्ध होत नाहीत. अधिकारी तर पदाधिकारी आणि नगरसेवकांना दाद देत नाहीत. निवडणुका तोंडावर आल्या आहेत. विकासकामे ठप्प पडली आहेत. या सगळ्यांचा संताप नगरसेवकांनी उपमहापौर संजय जोशी यांच्यावर काढून आपली खदखद व्यक्त केली.
सत्ताधारी पदाधिकारी निष्क्रिय असल्याचा अप्रत्यक्ष आरोप नगरसेवकांनी केला. मनपाच्या वर्धापनदिनी हा सगळा आसूड ओढण्याचा प्रकार घडला.
सभागृह नेते किशोर नागरे, नितीन चित्ते, बालाजी मुंडे, महेश माळवतकर यांच्यात उपमहापौरांच्या दालनात सुरू असलेली अनौपचारिक चर्चा अचानक वेगळ्या वळणावर जाऊन ठेपली. पालिकेत कुठलाही पदाधिकारी नगरसेवकांच्या व्यथा ऐकून घेण्यास तयार नाही. उपमहापौर जोशी उपलब्ध असल्यामुळे नगरसेवक आज त्यांच्यावर घसरले. माळवतकर, मुंडे यांच्याही तक्रारी होत्याच. सगळे प्रकरण हे आयुक्त, प्रशासकीय कामकाज आणि पदाधिकाऱ्यांच्या सक्षमतेच्या आजू-बाजूने फिरत होते.
प्रकरण क्रमांक १
नितीन चित्ते यांच्या पत्नी ऊर्मिला चित्ते या नगरसेविका आहेत. त्यांच्या वार्डातील अतिक्रमणे व बेकायदा बांधकामांवरून ते वारंवार प्रशासनाला निवेदने देऊन कारवाईची मागणी करीत आहेत; मात्र कुणीही त्यांना दाद देत नाही. त्यावरून आज ते उपमहापौरांवर संतापले.
उपमहापौरांनी अधिकारी शिवाजी झनझन यांना चित्ते यांच्या वार्डातील अतिक्रमण काढण्यास सांगितले होते. मात्र झनझन यांनी ती कारवाई केली नाही. त्यामुळे चित्ते म्हणाले, अधिकारी पदाधिकाऱ्यांचे ऐकत नाहीत. जोशी यांनीही चित्ते यांना रागाच्या भरात सुनावले. ते म्हणाले, तुम्हाला काय करायचे, कुणाकडे तक्रार करायची ती करा.
प्रकरण क्रमांक २
चित्ते यांचा वाद संपत नाही, तोवर नगरसेवक बालाजी मुंडे यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, अधिकारी महापौरांचेही ऐकत नाहीत. विकासकामांसाठी नगरसेवक पालिकेत हेलपाटे मारतात. अधिकारी नगरसेवकांचे ऐकत नाहीत, तर अधिकारी पदाधिकाऱ्यांना दाद देत नाहीत.
प्रकरण क्रमांक ३
नगरसेवक महेश माळवतकर म्हणाले, विकासकामे ही झालीच पाहिजेत. पदाधिकारी येथे कशासाठी बसले आहेत. पदाधिकारी येथे बसले आहेत तर त्यांचा उपयोग झालाच पाहिजे. राजीनामे देऊन किंवा माफी मागून काम भागणार नाही. ४
विकासकामे होत नसल्यामुळे भाजपाच्या नगरसेवकांनी सामूहिक राजीनामे देऊन टाकले पाहिजेत. पत्रके वाटून जनतेची माफी मागितली पाहिजे. आम्हाला माफ करा, आम्ही तुमची कामे करू शकत नाही. विकासकामे होणार नाहीत, असे स्पष्टपणे सांगून टाका. जनतेला पत्रक वाटून आम्हीच तसे सांगू, असा सूरही नगरसेवकांनी उपमहापौरांशी बोलताना आळविला.
आयुक्तांना घेरण्याची तयारी
४उपमहापौरांच्या दालनातील ही सगळी चर्चा आयुक्त महाजन यांना घेरण्याच्या बाजूने सुरू होती. गेल्या शनिवारी विरोधकांनी महाजन यांना घेरून विकासकामांचा मार्ग मोकळा करून घेतला. आता सत्ताधारी नगरसेवक आयुक्तांंच्या बंगल्यासमोर ठिय्या देण्याच्या तयारीत आहेत.