पेरणी नसली, तरी मिळणार विमा
By Admin | Updated: June 23, 2014 00:24 IST2014-06-22T22:35:53+5:302014-06-23T00:24:47+5:30
लातूर : हवामान आधारित पीक विमा योजना लातूर जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. पेरणी केली नसली, तरी या योजनेत पिकांना संरक्षण दिले जाणार आहे.

पेरणी नसली, तरी मिळणार विमा
लातूर : हवामान आधारित पीक विमा योजना लातूर जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. पेरणी केली नसली, तरी या योजनेत पिकांना संरक्षण दिले जाणार आहे. कमी पाऊस, पावसातील खंड, अतिपाऊस या घटकांमुळे कृषी उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे विमा संरक्षण देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक डॉ.टी.एस. मोटे यांनी दिली.
खरीप ज्वारी, सोयाबीन, उडीद, मूग या पिकांसाठीच ही योजना लागू करण्यात आली आहे. ज्वारीसाठी विमा संरक्षित रक्कम १५ हजार रुपये असून, त्याचा हप्ता ४.८३ टक्के आहे. तर विमा हप्त्याची रक्कम ७२४.५० एवढी आहे. सोयाबीनसाठी १९ हजार रुपये विमा हप्ता असून, ४.८० टक्के विमा आहे. उडीद-मूग पिकासाठी १५ हजार रुपये तर विमा हप्त्याची रक्कम ४.४३ टक्के आहे. बजाज अलाईन्स जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. पीक संरक्षित करण्याची अंतिम मुदत ३० जून असून योजना बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून, कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीची केली आहे. विमा योजनेसाठी महसूल मंडळ क्षेत्र घटक धरून राबविण्यात येत आहे. योजनेचा विमा हप्ता शेतकऱ्यांनी जवळच्या प्राधिकृत बँक, प्राथमिक कृषी सहकारी संस्थेत भरता येईल. प्रस्तावासोबत सातबारा, शेतकऱ्यांचे बँक खाते असणे आवश्यक असल्याचे कृषी अधिकारी डॉ. मोटे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)