प्रदूषण जास्त असेल तर फटाक्यांवर बंदी घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:29 IST2020-11-12T07:29:15+5:302020-11-12T07:29:15+5:30
औरंगाबाद : हवेचे प्रदूषण ज्या शहरात जास्त आहे, तेथे फटाके वाजविण्यावर राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घालण्यासंदर्भात आदेश काढले आहेत. ...

प्रदूषण जास्त असेल तर फटाक्यांवर बंदी घाला
औरंगाबाद : हवेचे प्रदूषण ज्या शहरात जास्त आहे, तेथे फटाके वाजविण्यावर राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घालण्यासंदर्भात आदेश काढले आहेत. लवादाच्या यादीत औरंगाबाद शहराचादेखील समावेश आहे. मात्र, फटाके विक्री आणि नागरिकांना फटाके फोडण्यासाठी बंदी घालण्यात आलेली नाही. बंदीच्या सावटाखाली मंगळवारपासून शहरात फटाके विक्रीला सुरुवात झाली.
कोरोनामुळे यंदा फटाके फोडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. बंदीसंदर्भात अद्याप राज्य शासनाकडून आदेश प्राप्त झाले नाहीत. आदेश आले तर पोलीस विभाग निर्णय घेईल, असे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी स्पष्ट केले.
कोरोनामुळे अनेक राज्यांत फाटक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. राज्यात मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फटाके न वाजविण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रीय हरित लवादाने सोमवारी देशातील हवा दूषित असलेल्या मोठ्या शहरांची यादी जाहीर केली. मागील महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये शहरातील प्रदूषणात वाढ झाल्याचे लवादाने नमूद केले आहे.
------------
बंदी यापूर्वीच घालायला हवी होती
जय महाराष्ट्र फटाका असोसिएशन अयोध्यानगरीचे अध्यक्ष गोपाळ कुलकर्णी यांनी सांगितले की, आवश्यक परवानगी घेऊन मंगळवारपासून अयोध्यानगरी, हडको टीव्ही सेंटर, कलाग्राम, बीड बायपास, छावणी येथे फटाका विक्री सुरू झाली आहे. व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात माल खरेदी केला आहे. बंदी घातली तर या मालाचे काय करायचे? बंदी घालायचीच होती तर किमान महिनाभरापूर्वी निर्णय घेणे गरजेचे होते.
----------------