आई देवाघरी गेल्याचे चिमुकल्या मुलींना उमगलेच नाही...!

By Admin | Updated: June 21, 2016 01:12 IST2016-06-21T01:08:17+5:302016-06-21T01:12:02+5:30

औरंगाबाद : महिनाभरानंतर आई आजारपणातून बरी झाली होती...दुपारी माझ्यासोबत बोललीही...सायंकाळी मात्र काही बोलत नव्हती.

I do not understand the girls in my mother's house ...! | आई देवाघरी गेल्याचे चिमुकल्या मुलींना उमगलेच नाही...!

आई देवाघरी गेल्याचे चिमुकल्या मुलींना उमगलेच नाही...!


औरंगाबाद : महिनाभरानंतर आई आजारपणातून बरी झाली होती...दुपारी माझ्यासोबत बोललीही...सायंकाळी मात्र काही बोलत नव्हती. त्यामुळे रात्रभर आईजवळ बसून होते. सकाळीही आई बोलत नसल्याने शाळेत जाऊन सरांना सांगितले. तेव्हा सगळे सर घरी आले. आई देवाघरी गेल्याचे त्यांनी सांगितले. बालवयात मातृछत्र हरवलेल्या दोन चिमुकल्यांंना हे सांगताना अश्रू आवरणे कठीण झाले होते. मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनजवळ त्यांचे घर आहे.
संगीता राजू निसर असे या मयत मातेचे नाव आहे, तर अनिता आणि सुशीला अशी या दोन चिमुकलींची नावे आहेत.
वडिलांचे छत्र लहानपणीच हरवले. अशा परिस्थितीत आईने काबाडकष्ट करून मुलींना वाढविले. परंतु आईच्या उपचारासाठी अनेक अडचणींना तोंड देण्याची वेळ या दोन बहिणींवर आली. महिनाभरापूर्वी उपचारासाठी त्यांनी आईला घाटीत दाखल केले. या चिमुकलींवर ओढवलेल्या या प्रसंगाविषयी ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित करण्यात आल्यानंतर अनेकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. उपचारानंतर आईला घेऊन घरी आले होते. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा घाटीत गेले. तेव्हापासून आईला बरे वाटत होते, असे अनिताने सांगितले. परंतु रविवारी सायंकाळी आई अचानक शांत झाली. आईला काय झाले, हे मुलींना कळत नव्हते. त्यामुळे मुली रात्रभर आईजवळच बसून होत्या. आई सोडून गेली, याची कल्पनाही त्यांना नव्हती.
सोमवारी सकाळीदेखील आई उठली नसल्याचे अनिताने शाळेच्या मुख्याध्यापिका टी.ए. देशमुख (मॉडर्न कन्या विद्यालय, गारखेडा) यांना सांगितले.
देशमुख यांनी शिक्षक प्रा.शेषराव जाधव, शेख शफिक, जितेंद्र शिसोदे, एकनाथ मोटे यांना तिच्या घरी पाठविले. तिच्या आईचे निधन झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तोपर्यंत घरी तिची आजी, मावशी आल्या होत्या. हलाखीच्या परिस्थितीमुळे अंत्यविधी कसा करावा, असा प्रश्न उभा राहिला. अनेकांनी मदतीसाठी पुढाक ार घेतला.
मुकुंदवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यविधी झाला. नातेवाईकांची परिस्थिती बेताचीच आहे. चांगल्या भविष्यासाठी दोन्ही बहिणींची बालगृहात व्यवस्था केली जाणार असल्याचे बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा अ‍ॅड.रेणुका घुले यांनी सांगितले.
नियतीचा खेळ
ज्या आईने वाढविले, स्वत: खस्ता खाल्ल्या, शिक्षण दिले, त्या आईला खांदा देण्याची वेळ येईल, असा विचारही कधी या चिमुकल्यांच्या मनात आला नसेल. परंतु नियतीने हा प्रसंग आणला. हे पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळत होते.

Web Title: I do not understand the girls in my mother's house ...!