पत्नीला नुकसानभरपाई देण्याचा पतीला आदेश
By Admin | Updated: December 18, 2015 23:50 IST2015-12-18T23:40:34+5:302015-12-18T23:50:08+5:30
पैठण : भरधाव वेगाने मोटारसायकल चालवू नका, चुकून जरी अपघात झाला आणि त्यात पत्नी जखमी झाली तर पत्नीस नुकसानभरपाई देण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते.

पत्नीला नुकसानभरपाई देण्याचा पतीला आदेश
पैठण : पत्नीसह मोटारसायकलवरून प्रवास करत असाल तर सावधान ..... भरधाव वेगाने मोटारसायकल चालवू नका, चुकून जरी अपघात झाला आणि त्यात पत्नी जखमी झाली तर पत्नीस नुकसानभरपाई देण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते.
असा निर्णय नुकताच मोटार अपघात न्यायाधिकरणाने पैठण येथील पती-पत्नीच्या अपघातानंतर पत्नीने दाखल केलेल्या दाव्यासंदर्भात दिला आहे. जखमी पत्नीस पती व विमा कंपनीने २,६४,००० रु. व या वरील ९% दराने होणारे व्याज नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश नुकतेच औरंगाबाद न्यायाधिकरणाने दिले आहेत. यामुळे पत्नीसह मोटारसायकलने प्रवास करत असाल तर खबरदार. भरधाव व निष्काळजीपणाने वाहन चालवू नका, हा संदेश या निमित्ताने प्रसारित झाला आहे.
पैठण येथील माहेश्वरी भक्त निवासचे व्यवस्थापक असलेले श्रीराम काकडे व त्यांच्या पत्नी दयासागर काकडे हे दाम्पत्य २४ मे,२०१० रोजी माजलगाव येथून त्यांच्या मोटारसायकलने पैठणकडे येत होते. दरम्यान, गढी जवळील खांडवी फाट्याजवळ अचानक एक कुत्रे त्यांच्या मोटारसायकलसमोर आले. त्या कुत्र्याला वाचवता वाचवता श्रीराम काकडे यांच्याकडून मोटारसायकल रस्त्यालगत असलेल्या वडाच्या झाडावर जाऊन धडकली. यात दोघेही जखमी झाले. अपघातात जखमी झालेल्या दयासागर काकडे यांच्यावर औरंगाबाद येथील हॉस्पिटलमध्ये महिनाभर उपचार करण्यात आले. त्यांना २०% अपंगत्व आले होते. उपचार घेऊन घरी आल्यानंतर आपल्या अपघातास व अपंगत्वास पती श्रीराम काकडे यांचे निष्काळजीपणाने भरधाव मोटारसायकल चालवणेच जबाबदार असल्याची धारणा दयासागर काकडे यांची झाली व त्यांनी वकील संदीप राजेभोसले यांच्या मार्फत विमा कंपनी व पती श्रीराम काकडे यांच्या विरोधात ६ लाख रुपये नुकसानभरपाईचा दावा औरंगाबाद अपघात न्यायाधिकरणात दाखल केला होता. हा दावा मान्य करत पत्नीस नुकसानभरपाई देण्याचे आदेश न्यायाधिकरणाने दिले आहेत.
पतीविरोधात न्यायालयात दावा दाखल केला असला तरी दोघे पती-पत्नी एकाच घरात राहत आहेत. गेल्या चार वर्षांपासून न्यायालयात दावा चालू असला तरी त्यांच्यात कधी कटुता आली नाही. चर्चा झाली तर फक्त कोण जिंकणार हीच होत होती, असे श्रीराम काकडे यांनी सांगितले.