पाचशेवर कर्मचार्‍यांची वेतनाअभावी उपासमार

By Admin | Updated: May 24, 2014 01:34 IST2014-05-24T00:59:22+5:302014-05-24T01:34:19+5:30

बीड : येथील नगर परिषदेतील कर्मचार्‍यांचे मागील सात महिन्यांपासून पगार न झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

Hunger in starvation due to employer salary | पाचशेवर कर्मचार्‍यांची वेतनाअभावी उपासमार

पाचशेवर कर्मचार्‍यांची वेतनाअभावी उपासमार

बीड : येथील नगर परिषदेतील कर्मचार्‍यांचे मागील सात महिन्यांपासून पगार न झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यामध्ये २०० सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचाही समावेश आहे. येथील नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आज येथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली असून वेळेवर पगार मिळत नसल्याने त्यांचा कामाचा उत्साह सुद्धा कमी झाला आहे. येथे काम करणार्‍या ५७४ कर्मचार्‍यांचे नोव्हेंबर २०१३ पासून पगार झालेले नाहीत. दिवसभर काम करून शहराची साफसफाई करणार्‍या सफाई कामगारांचे हाल होत आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह या पगारावरच चालत असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ९ कोटी मालमत्ता कर थकित शहरातील नागरिकांकडे नगर परिषदेचा ९ कोटी रूपये मालमत्ता कर थकित आहे. हा कर शहरातील नागरिकांनी भरला तर या कर्मचार्‍यांचे पगार करून त्यांच्या उपासमारीचा प्रश्न दूर होऊ शकतो. मालमत्ता कर थकित राहिल्यानेही या पगाराला अडचणी येत असल्याचे एका सूत्राने सांगितले. २७ लाख रूपयांची भासते कमी या कर्मचार्‍यांच्या पगारासाठी प्रति महिना सध्या २७ लाख रूपयांची कमी पडत असल्याचे आस्थापन विभागातील गणेश पगारे यांनी सांगितले. पुर्वी या कर्मचार्‍यांच्या पगारासाठी ६९ लाख रूपये येत होते व १ कोटी १० लाखाची आवश्यकता होती. त्यावेळी ३२ लाख रूपये कमी येत होते, तर आता मे २०१३ (सहाव्या वेतन आयोगामुळे) पासून यामध्ये वाढ होऊन ९३ लाख रूपये येत आहेत. तर १ कोटी २० लाख रूपयांची आवश्यकता आहे. यामध्ये सुमारे २७ लाख रूपये प्रति महिना कमी पडत असल्याचेही पगारे यांनी सांगितले. पगार वेळेवर होत नसल्याने कर्मचार्‍यांचे अधिकच हाल होत आहेत. २०० सेवानिवृत्त कर्मचारीही प्रतीक्षेत २००९ पासून कुठल्याही सेवानिवृत्त कर्मचार्‍याला सेवानिवृत्ती वेतन मिळालेले नाही. २०० कर्मचार्‍यांना या सेवानिवृत्ती वेतनाची प्रतीक्षा आहे. सध्या कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांबरोबर यांचाही पगार रखडल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत मुख्याधिकारी व्ही.बी.निलावाड म्हणाले, अद्यापही या पगाराचे पैसे आलेले नाहीत. वरीष्ठांकडे याबाबत फाईल पाठविली आहे. आठ दिवसात फाईल मंजूर होईल. (प्रतिनिधी) येथील सफाई कामागराच्या पगारीही न झाल्यामुळे त्यांचा काम करण्याचा उत्साह मावळला आहे. त्यामुळे हे कामगार शहरातील साफसफाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत. ज्या नागरिकांकडे मालमत्ता कराची थकीत रक्कम बाकी आहे त्यांनी ती रक्कम भरण्याचे अवाहन न.प.ने केले आहे. ही रक्कम जर नागरिकांनी भरली तर या सफाई कामगारांचा पगार यातून होऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर मालमत्ता कर भरण्याचे अवाहन केले. आपल्याकडे कर थकित ठेवून या सफाई कामगारांच्या उपासमारीचे कारण ठरणार्‍यांनी न.प.कडून स्वच्छतेची अपेक्षाच करू नये, अशाही प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

Web Title: Hunger in starvation due to employer salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.