मानव विकास अंतर्गतच्या बसेस पुन्हा शाळेच्या वाटेवर
By Admin | Updated: June 19, 2014 00:18 IST2014-06-19T00:01:01+5:302014-06-19T00:18:40+5:30
श्रीनिवास भोसले, नांदेड सोमवारपासून शाळा सुरू झाल्या आहेत़ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेषत: मुलींना शाळेत ये-जा करण्यासाठी मानव विकास मिशन कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या बसेस
मानव विकास अंतर्गतच्या बसेस पुन्हा शाळेच्या वाटेवर
श्रीनिवास भोसले, नांदेड
सोमवारपासून शाळा सुरू झाल्या आहेत़ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेषत: मुलींना शाळेत ये-जा करण्यासाठी मानव विकास मिशन कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या बसेस उन्हाळी सुट्यानंतर पुन्हा शालेय मार्गावर धावत असल्याचे चित्र आहे़
मानव विकास मिशनअंतर्गत जिल्ह्यात निळ्या रंगाच्या एकूण ४५ बसेस आल्या होत्या़ त्या सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जात होत्या़ उन्हाळी सुट्यांमध्ये सदरील बसेस लांब पल्ल्याच्या गावांना तसेच प्रासंगिक करारासाठी चालविण्यात येत होत्या़ त्यापासून एसटी प्रशासनाला चांगले उत्पन्नही मिळाले़ परंतु १६ जून रोजी शाळा सुरु झाल्या असून मानव विकास अंतर्गतच्या सर्व बस नियमित व वेळेवर आगारातून मार्गस्थ करण्याच्या व ठरवून दिलेल्या मार्गावरच पाठवाव्यात, अशा सूचना विभाग नियंत्रक बाळासाहेब घुले यांनी आगारप्रमुखांना दिल्या आहेत़ त्यानुसार बसेस शालेय फेऱ्याकरिता वापरण्यात येणार आहेत़
मानव विकास मिशन अंतर्गतच्या जिल्ह्यात एकूण ४५ बसेस आहेत़ त्यामध्ये भोकर आगारास १० बसेस, नांदेड आगारास - ५ , किनवट - ५, देगलूर - ५, बिलोली - १०, कंधार- ५ तर हदगाव आगारास ५ बसेस उपलब्ध आहेत, अशी माहिती विभागीय सहाय्यक वाहतूक अधीक्षक एऩ एम़ चतुर्भुज यांनी दिली़
अनेक तालुक्यांना सदरील बस नसल्याने मुला-मुलींना गर्दीतून प्रवास करावा लागतो़ काही गावांमध्ये कोणतीही बस नसल्याने मुलींना अनेक किलोमीटरची पायपीट करीत शाळा गाठावी लागते़ विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार एसटी महामंडळाने बस सुरू कराव्यात, मानव विकासच्या बस वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे़ याकडेही एसटी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे़ (प्रतिनिधी)
मानव विकासअंतर्गतच्या बसेस इतर मार्गावर पाठविल्यास आगारप्रमुखांवर होणार कारवाई
मानव विकास शालेय फेऱ्या नियमित व वेळेवर न गेल्यास आगारप्रमुखांनाच जबाबदार धरून कार्यवाही होणार
ज्या ठिकाणी बसेस जात नाहीत अशा दुर्गम ग्रामीण भागात बसेस सोडण्याची विद्यार्थ्यांची मागणी