जिल्ह्यातील फळबाग उत्पादकांना विम्याची प्रतीक्षा
By Admin | Updated: February 5, 2015 00:53 IST2015-02-05T00:38:37+5:302015-02-05T00:53:14+5:30
गजेंद्र देशमुख , जालना जिल्ह्यात २०१२-१३ वर्षात दुष्काळी परिस्थितीमुळे शेकडो हेक्टरवरील मोसंबीसह इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या फळबागांना हवामानावर

जिल्ह्यातील फळबाग उत्पादकांना विम्याची प्रतीक्षा
गजेंद्र देशमुख , जालना
जिल्ह्यात २०१२-१३ वर्षात दुष्काळी परिस्थितीमुळे शेकडो हेक्टरवरील मोसंबीसह इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या फळबागांना हवामानावर आधारित विम्याचे कवच असले तरी अनेक शेतकऱ्यांना अद्यापही विम्याची रक्कम मिळाली नाही. विशेष म्हणजे केंद्रिय पथकाने पाहणी करुनही शेतकऱ्यांच्या पदरी अद्याप एक छदामही पडलेला नाही
जिल्ह्यातील १५९५८ शेतकऱ्यांनी १२ हजार ७२३ हेक्टरवरील फळ बागांकरीता ४८ लक्ष रुपयांचा विमा उतरविला होता. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे फळ बागांचे नुकसान झाले. दोन वर्षे उलटूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही. या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तात्काळ देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. गतवर्षी केंद्रिय समितीनेही जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी केली होती; तसा अभिप्रायही संबंधित विभागांना पाठविण्यात आला होता. मात्र असे असूनही शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. ज्या शेतकऱ्यांनी फळबागांचा विमा काढलेला आहे, अशांना तात्काळ तो वाटप करावा, असा उत्पादकांचा रेटा आहे.
हा विमा हवामान अधारित असल्याने विविध मंडळांमध्ये हवामान मोजणी यंत्र लावले होते. मात्र काही यंत्रे योग्य कार्यान्वित झाली नाहीत. तसेच त्या दरम्यान काही दिवस ढगाळ असल्याने उष्णतामान ३९ अंशावर गेले नाही. हाच मुद्दा पकडून संबंधितांनी विमाचा प्रस्ताव लालफितीत ठेवला. यानंतर शेतकऱ्यांच्या मागणीनंतर तसेच दुष्काळाची दहाकता लक्षात घेऊन केंद्रिय पथकाने पाहणी केली. त्यानुसार मोसंबी बागांचे नुकसान झाल्याचे आढळून आले. मात्र प्रत्यक्षात दोन वर्षे उलटूनही शेतकऱ्यांना काहीच मिळालेले नाही.
महाराष्ट्र राज्य मोसंबी उत्पादक संघाचे जिल्हाध्यक्ष भगवानराव डोंगरे म्हणाले, दुष्काळामुळे मोसंबी बागांचे सरपण झाले. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कृषी केंद्रिय पथकानेही प्रकराची पाहणी केलेली आहे. शेतकऱ्यांना एक ते सव्वा कोटींचा विमाही भरलेला आहे. विमा देण्याचेही आदेश तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार यांनी दिले होते. असे असले तरी अद्यापही शेतकऱ्यांना काहीच मिळालेले नाही. आमचा पाठपुरावा सुरु आहे.
जिल्हा कृषी अधीक्षक उमेश घाटगे म्हणाले, हवानान अधारित पीक विमा आहे. यासाठी वेगवेगळ्या मंडळात हवामान यंत्रही लावण्यात आले होते. त्यानुसार केंद्रिय पथकाने सदर फळबागांची पाहणी केली. नुकसानीचा अंदाज घेतला. कृषी विभागनेही माहिती सादर केली. मात्र अद्याप पर्यंत विम्या संबंधी आमच्याकडेही काहीही आदेश आले नाही.