सुटी संपली... शाळा भरली..!
By Admin | Updated: June 16, 2015 00:51 IST2015-06-16T00:31:46+5:302015-06-16T00:51:03+5:30
बीड : उन्हाळी सुट्यांतील धम्माल- मस्ती संपवून विद्यार्थ्यांनी सोमवारी दफ्तर पाठीवर लादत

सुटी संपली... शाळा भरली..!
बीड : उन्हाळी सुट्यांतील धम्माल- मस्ती संपवून विद्यार्थ्यांनी सोमवारी दफ्तर पाठीवर लादत शाळेचा रस्ता पकडला. त्यामुळे शाळांत पुन्हा मुला- मुलींचा किलबिलाट ऐकावयास मिळाला. प्रवेशोत्सवानिमित्त शनिवारीच शाळेत मुक्कामी असलेल्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ठिकठिकाणी फेऱ्या काढण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग होता.
पहिलीच्या वर्गात प्रवेश घेऊन शैक्षणिक आयुष्याचा श्रीगणेशा करणाऱ्या मुला-मुलींना शाळेत सोडण्यासाठी पालक आले होते. शाळेची ओढ व आई- वडिलांचा दुरावा अशा दुहेरी कोंडीत सापडलेल्या काही बालकांच्या डोळ्यात पाणी आले तर काही हुंदके देत होते.
नवे वर्ग, नवे शिक्षक, नवे सवंगडी अशा नवलाईने विद्यार्थी हरखून गेले. पहिला दिवस उन्हाळी सुटीत केलेली मौजमजा मित्रांशी ‘शेअर’ करण्यातच गेला. शिवाय काहींनी एकमेकांचा परिचय करुन देत नवे दोस्तही बनविले.
एऱ्हवी अभ्यासासाठी रागावणारे शिक्षक शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना दिसून आले. काही शाळांत विद्यार्थ्यांना फुल देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी भारावून गेले होते. दुपारी गोडभात देण्यात आला. उत्साही व आनंददायी वातावरणातच दिवस गेला. (प्रतिनिधी)
प्रवेशोत्सवानिमित्त सीईओ नामदेव ननावरे हे शनिवारी धर्मापुरी जि. प. शाळेत मुक्कामी होते. सोमवारी सकाळी विद्यार्थ्यांची गावातून फेरी काढण्यात आली. त्यानंतर शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे ननावरे यांनी फूल देऊन स्वागत केले. यावेळी पाठ्यपुस्तकांचेही वाटप करण्यात आले. गावकरी उपस्थित होते.
जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी सोमवारी विविध शाळांना सरप्राईज भेटी दिल्या. समाजकल्याण सभापती महेंद्र गर्जे, जि. प. सदस्य देवीदास धस, विजय पोटे त्यांच्यासोबत होते.
४पाली, मांजरसुंबा (ता. बीड), आष्टी, शेरी येथील शाळेतही ते गेले. यावेळी आरोग्य उपकेंद्रांमध्ये जाऊन त्यांनी रूग्णसेवेची पाहणी केली.
४शेरी येथे त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले. उत्तरे न देता आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. हलगर्जी, कामचुकार शिक्षकांची गय नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या ३ लाख ९४ हजार ८९४ विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तके आली आहेत. पहिली ते पाचवी प्राथमिक शाळेतील २ लाख ४९ हजार ८१५ तर सहावी ते आठवीतील उच्च प्राथमिक शाळेतील १ लाख ४५ हजार ७९ विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल. पहिल्या दिवशी पुस्तकांचे वाटप झाले असून उर्वरित विद्यार्थ्यांना ते जसे येतील तसे वाटप केले जाणार आहे.
जिल्ह्यातील एकूण शाळांची संख्या साडेतील हजाराहून अधिक आहे. जि.प. च्या २ हजार ५१६ इतक्या प्राथमिक तर ५६ माध्यमिक शाळा आहेत. खासगी अनुदानीत प्राथमिक शाळा १४८ व खासगी माध्यमिक शाळांचा आकडा ६१० इतका आहे. खासगी कायम विनाअनुदानीत १३० शाळांचाही समावेश आहे. याशिवाय ५०० हून अधिक खासगी विनाअनुदानीत इंग्रजी शाळा देखील आहेत.