ऐतिहासिक हिमायतबागेला तातडीने वाचविण्याची गरज!
By Admin | Updated: July 21, 2014 00:43 IST2014-07-21T00:37:34+5:302014-07-21T00:43:20+5:30
डॉ. शेख रमजान, औरंगाबाद औरंगाबाद शहर वसविले मलिक अंबरने. अहमदनगरच्या निजामशाहीचा तो शेवटचा राजा. तो एक निग्रो होता.

ऐतिहासिक हिमायतबागेला तातडीने वाचविण्याची गरज!
डॉ. शेख रमजान, औरंगाबाद
औरंगाबाद शहर वसविले मलिक अंबरने. अहमदनगरच्या निजामशाहीचा तो शेवटचा राजा. तो एक निग्रो होता. आफ्रिकेतला गुलामच तो. आई-वडिलांनी १२-१३ वर्षांचा असताना त्याला विकले. अहमदनगरच्या एका सरदाराने त्याला विकत घेतले. मलिक अंबर येथेच लहानाचा मोठा झाला. पुढे अहमदनगर निजामशाहीचा तोच सर्वेसर्वा झाला.
मोघलांपासून बचाव करण्यासाठी त्याला दौलताबादच्या किल्ल्यात राहावे लागले. पुढे सुरक्षित शहर म्हणून त्याने औरंगाबादला राजधानीचे शहर म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी औरंगाबाद म्हणजे काय, तर खडकेश्वर मंदिर आणि त्याच्या शेजारी २०-३० झोपड्या. त्याने हे शहर विकसित करण्यासाठी एक नियोजन केले. त्यानुसारच पुढे हे शहर वाढले. रस्ते बांधले गेले. प्रत्येक सरदाराला एकेक भाग वाटून दिला. पुढे या सरदारांनीच आपापल्या भागाचा विकास केला. त्यावेळी औरंगाबादसमोर सर्वांत मोठा प्रश्न पाण्याचा होता. दोन प्रकारे त्याने पाण्याची व्यवस्था केली. त्याने एक मोठा तलाव बांधण्याचा निर्णय घेतला. शहराच्या उत्तरेचा भाग उंचावर असल्याने हा तलाव त्याने याच दिशेला बांधला.
सलीम अली तलाव हे त्याचे अलीकडचे नाव. साधारण १९८३ च्या काळात ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ सलीम अली यांनी या तलावाला भेट दिली. दिल्ली तलाव नावाने ओळखला जाणारा तलाव पुढे सलीम अलींच्या नावाने ओळखला जाऊ लागला. ज्याने या तलावाची उभारणी केली त्या मलिक अंबरचे नाव मागेच राहिले.
एवढा एक तलाव बांधून मलिक अंबर थांबला नाही, तर खाम नदीचे पाणी अडविण्यासाठी आमखास मैदान आणि गणेश कॉलनी अशा दोन ठिकाणी त्याने बांध घातला. यातून बाहेर पडणाऱ्या पाण्यासाठी त्याने नवा प्रवाह तयार केला. बेगमपुरा, बारापुल्लाच्या जवळून होलीक्रॉस हायस्कूलच्या जवळून असा हा पाण्याचा प्रवाह बाहेर काढण्यात आला. त्यामुळे भविष्यात औरंगाबादेत जेवढ्या विहिरी खोदल्या गेल्या त्या सर्वांना भरपूर पाणी लागले. या तलावात त्याने कमळाची लाखो फुले लावली. औरंगजेबाच्या काळापर्यंत म्हणजे १६६० पर्यंत हा तलाव तसाच होता. १६८३ मध्ये औरंगजेब बादशहा म्हणून औरंगाबादला आला. तोपर्यंत हा तलाव अगदी तसाच होता. त्याने किलेअर्क भागात आपली वस्ती वसविली.
चुन्याच्या भिंती असल्याने अडविलेल्या पाण्यामुळे ओलावा निर्माण होऊ लागला. त्यामुळे लोक आजारी पडू लागले. हा प्रकार लक्षात येताच या जागेवर बगिचा उभारण्याचे ठरले. दगड-मातीची भर टाकून ३०० एकरांवर बाग फुलविण्यात आली.
आंबा, पेरू, चिंच हे या बागेचे वैशिष्ट्य. पशू-पक्षी हे आणखी एक वैभव. बागेत माणसांचा हस्तक्षेप वाढल्याने हे सारे वैभव आता संपत आहे.
लोकांचा त्रास वाढत आहे. त्यांना या बागेत प्रवेश द्यायला हवा; पण तो एकाच मार्गाने. वाट्टेल तिथे फिरण्याची मुभा नसावी. असे केले तरच ही ऐतिहासिक बाग वाचेल.