अपहृत मुलगा सोलापुरातून ताब्यात
By Admin | Updated: March 15, 2015 00:38 IST2015-03-15T00:33:43+5:302015-03-15T00:38:14+5:30
उस्मानाबाद : शहरातील बार्शी नाका परिसरातून अपहरण झालेला मुलगा उस्मानाबाद व सोलापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुन्हा दाखल झाल्यापासून दोन दिवसात स्वगृही परतला आहे़

अपहृत मुलगा सोलापुरातून ताब्यात
उस्मानाबाद : शहरातील बार्शी नाका परिसरातून अपहरण झालेला मुलगा उस्मानाबाद व सोलापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुन्हा दाखल झाल्यापासून दोन दिवसात स्वगृही परतला आहे़ ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास शहरातील बार्शी नाका परिसरात घडली होती़
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बार्शी नाका परिसरातील यशवंतनगर भागात राहणारा ज्ञानेश्वर कुंडलीक गायकवाड (वय-१६ रा़ बरमगाव बु़) हा दहावीत शिक्षण घेत आहे़ तो आजीसोबत रूम करून राहत होता़ ज्ञानेश्वर हा बुधवारी दुपारी गावाकडे जायचे म्हणून आजीला सांगून घराबाहेर पडला होता़ मात्र, रात्री उशिरापर्यंत त्याचा पत्ता लागला नाही़ तो गावाकडेही आला नसल्याने नातेवाईकांनी त्याची शोधाशोध केली़ त्यांनतर गुरूवारी शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांनी ज्ञानेश्वर याचे अपहरण केल्याची फिर्याद कुंडलिक शिवराम गायकवाड यांनी दिली होती़ तपासाधिकारी पोउपनि विशाल शहाणे यांनी पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, पोनि डी़एम़शेख यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेची माहिती राज्यातील इतर पोलीस ठाण्यांना दिली.
शनिवारी सकाळी सोलापुरातील शिवाजी चौकात संशयितरित्या फिरणाऱ्या ज्ञानेश्वरला सोलापूर येथील पोना सोनार यांनी पाहिले़ त्यांनी चौकशी केली असता, आपल्याला ट्रकमध्ये घालून काही लोकांनी आणल्याचे त्याने सांगितले़ सोनार यांनी पोउपनि शहाणे यांच्याशी संपर्क साधला़ त्यानंतर सोनार यांनी त्याला सोलापूर पोलिसांच्या ताब्यात दिले़ तेथून ज्ञानेश्वरला ताब्यात घेवून शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे़ कायदेशीर प्रक्रियेनंतर त्याला त्याच्या पालकाच्या स्वाधीन करण्यात आले़ मुलगा घरी परतल्यानंतर त्याच्या पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते़ (प्रतिनिधी)