‘धर्माच्या नावावर चालणाऱ्या चळवळीला भांडवलदारांची मदत’
By Admin | Updated: August 18, 2014 00:57 IST2014-08-18T00:24:00+5:302014-08-18T00:57:37+5:30
जालना : धर्माच्या नावावर चालणाऱ्या चळवळीला भांडवलदारांची मदत मिळत असून, ही भांडवलशाही धर्माच्या नावावर राज्य निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे,

‘धर्माच्या नावावर चालणाऱ्या चळवळीला भांडवलदारांची मदत’
जालना : धर्माच्या नावावर चालणाऱ्या चळवळीला भांडवलदारांची मदत मिळत असून, ही भांडवलशाही धर्माच्या नावावर राज्य निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे, असे मत ज्येष्ठ कामगार नेते व विश्लेषक डॉ.भालचंद्र कांगो यांनी येथे केले.
जालना येथील लोकमंगल प्रतिष्ठानच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ‘जागतिकीकरणात कामगार चळवळीचे भवितव्य’ या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून कामगार नेते अण्णा सावंत यांची उपस्थिती होती. तसेच प्रसिध्द लेखक विचारवंत डॉ.प्रल्हाद लुलेकर, प्रा.श्याम मुंडे आदींची वक्ते म्हणून उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना डॉ.कांगो म्हणाले की, धर्मांध शक्तीला रोख शकणारी एकही शक्ती आज नाही, जाती धर्माच्या नावाने रोज नवीन संघटना वाढत आहे.
जाती धर्माला पाठिंबा देवून पिळवणुकीवर आधारीत समाजरचना निर्माण होत आहे. कामगार चळवळीला नेस्तनाबूत करण्याचे षडयंत्र भांडवलदारांकडून रचले जात आहे. मात्र, कामगार चळवळ ही पृथ्वीच्या अंतापर्यंत जीवंत राहील, यात शंका नाही. भारतीय समाज रचनेत संघटीत व असंघटीत कामगार मोठ्या प्रमाणात असले तरी जाती व धर्मात ते विखुरले गेले आहेत. भांडवलशाही समाजात विषमता निर्माण करून देशातील कष्टकरी व कामगारांना नागडे करण्याच्या प्रयत्नात आहेत. भांडवलशाहीचा हा डाव कष्टकरी व कामगारांनी संघटीत होऊन उधळून लावावा, असे आवाहनही डॉ.कांगो यांनी केले.
यावेळी बोलतांना डॉ.प्रल्हाद लुलेकर म्हणाले की, मध्यमवर्गीयामुळे समस्त चळवळीला धोका निर्माण झाला आहे.
हा मध्यमवर्गीय समाज कुठलीही भूमिका घेत नाही. त्यांच्याकडून नितीपालनाचे कार्य होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य व उपेक्षित समाज संघटीत होत नाही. जागतिकीकरणात मानवी मुलभूत सुविधा उपलब्ध न करता उलट तीर्थक्षेत्राच्या विकासावर उधळपट्टी केली जात आहे. मानवी विकासाकडे लक्ष दिले जाईल, अशी परिस्थिती आज तरी दिसत नसल्याचे डॉ.लुलेकर म्हणाले.
यावेळी बोलतांना डॉ.श्याम मुडे म्हणाले की, कष्टकरी व कामगारवर्ग या भांडवलाहीत बेदखल झाला आहे. आज या कष्टकरी व कामगारांना बेदखल समाज म्हणून बघितले जात आहे.
या समाजाचे प्रश्न जागतिकीकरणामुळे अत्यंत बिकट झाले असून, या समाजाला संघटीत करून त्यांची दखल घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोप करतांना कामगार नेते अण्णा सावंत म्हणाले की, जागतिकीरणात कामगार चळवळ टिकवून ठेवण्यासाठी संघटन आवश्यक असून, भांडवलशाही विरूध्द एकसंघ होऊन लढा उभारण्याची आज गरज आहे. कष्टकरी व कामगारांना सोबत घेऊन सर्वांनी त्यांना विकासाच्या मार्गावर आणले पाहिजे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)