ढीगभर प्रस्ताव, लाभार्थी मात्र मोजकेच
By Admin | Updated: April 19, 2016 00:55 IST2016-04-19T00:46:57+5:302016-04-19T00:55:53+5:30
बीड : मागेल त्याला शेततळे या योजनेच्या अंतिम मुदतीपर्यंत जिल्ह्यातून सेवाशुल्कासह व सेवाशुल्काशिवाय १० हजार प्रस्ताव कृषी विभागाकडे दाखल झाले असून,

ढीगभर प्रस्ताव, लाभार्थी मात्र मोजकेच
बीड : मागेल त्याला शेततळे या योजनेच्या अंतिम मुदतीपर्यंत जिल्ह्यातून सेवाशुल्कासह व सेवाशुल्काशिवाय १० हजार प्रस्ताव कृषी विभागाकडे दाखल झाले असून, २७८ शेततळ्यांना कार्यारंभ करण्याचे आदेश मिळाले आहेत.
योजनेच्या दीड महिन्यांच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या प्रस्तावांचा पाऊस पडला होता. किमान योजनेत सहभाग घ्यावा या उद्देशाने शेतकऱ्यांनी आॅन लाईन व थेट कृषी कार्यालयात अर्ज जमा केले होते. १३ एप्रिल ही अर्ज करण्याची अंतिम तारीख होती. प्रस्तावांची संख्या हजारोंच्या घरात असली तरी छाननी प्रक्रिया, अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी व कामास सुरुवात करावयाची की नाही, अशा मन:स्थितीत असल्यामुळे २७८ शेतकऱ्यांनाच कार्यारंभ करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यापैकी किती शेततळ्यांच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची स्वत:कडील पैसे करण्याची मन:स्थिती नाही. यातच अनुदानाची रक्कम कमी असल्याने त्यांच्यात उदासीनता दिसत आहे. शेततळ्यांच्या आकारमानानुसार २२ हजार ११० रुपयांपासून ते ५० हजारांपर्यंत अनुदान रक्कम देण्यात येणार आहे.
नरेगाअंतर्गत शेततळ्यांना दीड लाखांचे अनुदान मिळाले होते; मात्र मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत केवळ ५० हजार रुपयांवरच बोळवण होत असल्याने शेतकऱ्यांनी योजनेकडे पाठ फिरवली आहे.
कार्यारंभाचे आदेश मिळालेल्या शेतकऱ्यांना प्रशासनातर्फे एक महिन्याची मुदत मिळाली आहे. या काळात काम सुरू न केल्यास हा प्रस्ताव अपात्र ठरविला जाणार आहे. गळतीचे प्रमाण वाढल्याने जिल्ह्याला ठरवून दिलेले २४८० शेततळ्यांचे उद्दिष्ट पूर्ण होते की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)