शहरांची तंटामुक्ती केवळ कागदावरच

By Admin | Updated: June 19, 2014 00:20 IST2014-06-18T23:50:21+5:302014-06-19T00:20:01+5:30

उस्मानाबाद : शहरे तंटामुक्त करण्यासाठी शासनाकडून करण्यात आलेले नियोजन कागदावरच राहिले असून, प्रायोगिक तत्त्वावर औरंगाबादेतही अल्पप्रतिसाद मिळाला आहे़

The hassle of the city is only on paper | शहरांची तंटामुक्ती केवळ कागदावरच

शहरांची तंटामुक्ती केवळ कागदावरच

उस्मानाबाद : शहरे तंटामुक्त करण्यासाठी शासनाकडून करण्यात आलेले नियोजन कागदावरच राहिले असून, प्रायोगिक तत्त्वावर औरंगाबादेतही अल्पप्रतिसाद मिळाला आहे़ सहा वर्षात उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यांतर्गत तिन्ही गावे तंटामुक्त असून, उस्मानाबाद ग्रामीण, बेंबळी, ढोकी पोलिस ठाण्यांतर्गतही मोहीम थंडावली आहे़ चारही ठाण्यांतर्गतच्या १४० पैकी १०७ गावे तंटामुक्त झाली असून, उर्वरित गावेही तंटामुक्त करण्याची गरज आहे़
राज्य शासनाच्या वतीने सन २००७ पासून सुरू करण्यात आलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला उस्मानाबाद शहर, ग्र्रामीण, बेंबळी, ढोकी या पोलिस ठाण्यांतर्गत प्रारंभीच्या चार वर्षात मोठा प्रतिसाद मिळाला़ गावातील तंटे गावातच मिटू लागल्याने व गावच्या विकास कामांसाठी बक्षीसरूपी निधी मिळू लागल्याने गावो-गावच्या ग्रामस्थांनी मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला़ या मोहिमेत उस्मानाबाद शहर ठाण्यांतर्गतच्या चार पैकी सहा वर्षात तीन, उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत ४५ गावांपैकी २४, बेंबळी पोलिस ठाण्यांतर्गतच्या ४७ पैकी ३५, ढोकी पोलिस ठाण्यांतर्गतच्या ४४ पैकी २५ गावे तंटामुक्त झाली आहेत़
दरम्यान, तंटामुक्त झालेल्या गावांना शासनाच्या वतीने एक लाखापासून दहा लाखापर्यंतची लोकसंख्येवर आधारित बक्षीस रक्कम मिळाली आहे़ बहुतांश गावातील समित्यांनी या निधीचा खर्च नियमानुसार गावच्या विकासासाठी खर्च करण्यात आले असून, यामुळे गावा-गावांचा कायापालट झाला आहे़ मात्र, उर्वरित ३३ गावे तंटामुक्त करण्यासह तंटामुक्त गावातील शांतता कायम ठेवण्याकडे संबंधित गावच्या समिती पदाधिकाऱ्यांसह प्रशासनाचेही दुर्लक्ष झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे़
बक्षिसाची प्रतीक्षा कायम
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या सहाव्या वर्षी सन २०१२-१३ मध्ये जिल्ह्यातील २९ गावे तंटामुक्त झाली आहेत़ मोहिमेच्या सातव्यावर्षीचे सन १०१३-१४ प्रस्ताव मागविण्यात आलेले असून, अद्यापही गतवर्षीच्या तंटामुक्त गावांना पारितोषिके देण्यात आलेली नाहीत़ शासनाच्या या लालफिती कारभारामुळे बक्षीसपात्र गावातील समित्यांमध्ये नाराजी आहे़
आघावांची कामगिरी कौतुकास्पद
ढोकी पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक अविनाश आघाव यांनी जिल्ह्यात या मोहिमेला गती देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे़ पहिल्या वर्षी सन २००७-०८ मध्ये एक गाव तंटामुक्त झाले होते़ मात्र, नंतर दुसऱ्या वर्षी सन २००८-०९ मध्ये आघाव यांच्या प्रयत्नातून तब्बल १२ गावे तंटामुक्त झाली आणि जिल्ह्यात मोहिमेला मोठी गती मिळाली़
तंटामुक्त गावात तंटे
गत सहा वर्षात तंटामुक्त झालेल्या अनेक गावात आजही मोठ्या प्रमाणात तंटे उद्भवत आहेत़ बक्षीस मिळेपर्यंत काम करणाऱ्या समित्यांसह गावातील पुढाऱ्यांनी ‘स्व’ राजकारण सुरू केल्याने तंटे मोठ्या प्रमाणात उद्भवत आहेत़
ना अधिकाऱ्याचा, ना कर्मचाऱ्याचा सन्मान
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम गावा-गावात यशस्वी करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न मोठे आहेत़ त्यांच्या प्रयत्नाने जिल्ह्यातील शेकडो गावे तंटामुक्त झाली असून, कोट्यवधी रूपयांचा निधी गावांच्या विकास कामासाठी मिळाला आहे़ मात्र, तंटामुक्तीचे उत्कृष्ठ काम केल्याने शासनाकडून अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांचा साधे प्रमाणपत्र देवूनही गौरव केला जात नाही, ही खेदाची बाब आहे़
पोलिसांच्या खांद्यावर ओढे...
गृहविभागाकडून ही मोहीम राबविली जात असली तरी मोहिमेला मूर्त रूप देण्यासाठी राज्य शासनाने पोलिस प्रशासनासह, जिल्हाधिकारी (महसूल), जिल्हा परिषद या तिन्ही विभागांवर समांतर जबाबदारी सोपविली होती़ प्रारंभीच्या काही काळात या विभागांनी काम केले़ त्यानंतर मात्र महसूलसह जिल्हा परिषद विभागाने या मोहिमेकडे साफ दूर्लक्ष केल्याने पोलिसांनाच मोहिमेचे ओझे ओढावे लागत आहे़
खर्चाची चौकशी होण्याची गरज
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत तंटामुक्त झालेल्या गावांना लाखो रूपयांची पारितोषिके मिळाली आहेत़ ही पारितोषिके कोणत्या कामावर खर्च करावीत याचे काही नियम शासनाने घालून दिले आहेत़ मात्र, अनेक गावातील समित्यांसह ग्रामपंचायतींनी राजकारण करीत हा निधी इतरत्र खर्च केल्याचा आरोप होत आला आहे़ त्यामुळे या निधी खर्चाची चौकशी होण्याची गरज आहे़
बेंबळी ठाण्याची आघाडी
उस्मानाबाद तालुक्यातील चारही पोलिस ठाण्यांतर्गत मोहीम यशस्वी करण्यात बेंबळी पोलिसांनी आघाडी घेतली आहे़ ठाण्यांतर्गत असलेल्या ४७ पैकी तब्बल ३५ गावे तंटामुक्त झाली आहेत़ यात पहिल्यावर्षी एक, तिसऱ्या वर्षी सहा, चौथ्या वर्षी ११, पाचव्या वर्षी पाच तर सहाव्या वर्षी दोन गावे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्यातून तंटामुक्त केली आहेत़

Web Title: The hassle of the city is only on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.