हर्सूलने चिंता वाढविली
By Admin | Updated: July 7, 2014 00:44 IST2014-07-07T00:41:23+5:302014-07-07T00:44:14+5:30
औरंगाबाद : शहरातील १६ वॉर्डांना पाणीपुरवठा करणाऱ्या हर्सूल तलावातील ५ फूट पाणी आटले आहे. गेल्या वर्षी दुष्काळात तो तलाव पूर्णत: आटला होता.

हर्सूलने चिंता वाढविली
औरंगाबाद : शहरातील १६ वॉर्डांना पाणीपुरवठा करणाऱ्या हर्सूल तलावातील ५ फूट पाणी आटले आहे. गेल्या वर्षी दुष्काळात तो तलाव पूर्णत: आटला होता. तलावातील २० टक्के गाळ काढल्यानंतर पावसाळ्यात तलावामध्ये १९ फूट पाणीसाठा झाला. तलावाची क्षमता सुमारे ३० फुटांपर्यंत आहे. सध्या तलावात १३ फूट पाणीसाठा आहे. नोव्हेंबर २०१३ च्या अखेरीस तलावातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.
शहरातील जुन्या भागातील १६ वॉर्डांतील नागरिकांना हर्सूल तलावातून शुद्ध पाणीपुरवठा नोव्हेंबर २०१३ साली सुरू झाला. तलावातून दोन दिवसांआड ६ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातून पाणी घेण्याचा ताण थोड्या फार प्रमाणात कमी झाला. यामुळे मनपाची वीज, वेळ, पैसा वाचण्यास मदत झाली. २०१२ ते नोव्हेंबर २०१३ असा दीड ते दोन वर्षे हर्सूल तलावातून पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे जलवाहिनी व शुद्धीकरण केंद्रात मोठ्या प्रमाणात गाळ व घाण होती. व्हॉल्व्हची ग्रीसिंग व दुरुस्ती करण्यात आली. जलवाहिन्यांची चाचणी घेतल्यानंतर पाणीपुरवठा सुरू केला आहे.
१६ वार्डांमधील दीड लाख लोकांची भागतेय तहान
तलाव उंचावर असल्यामुळे दिल्लीगेटपर्यंत ४५० मि. मी. च्या आरसीसी जलवाहिनीतून ते पाणी आणले जाते. तेथे शुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून ते पाणी दिल्लीगेट येथील जलकुंभात जाते.
तेथून जुन्या शहरातील १६ वॉर्डांतील म्हणजेच सुमारे दीड लाख लोकांना त्याचे वितरण होत आहे.
४ ते ५ महिने पाणी पुरेल
आणखी ४ ते ५ महिने तलावातील पाणी पुरू शकेल. जून महिना पूर्णपणे कोरडा गेला आहे. पावसाने दडी मारल्यामुळे तलावातील पाणीसाठ्यात काहीही भर पडलेली नाही.
नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी केले.
२०९ गावांसाठी ३०६ टँकर
औरंगाबाद : पाऊस लांबल्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई परिस्थिती तीव्र झाली आहे. गेल्या आठवड्यात अनेक नवीन गावे टंचाईग्रस्त झाली आहेत. त्यामुळे या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील २०९ गावांना सध्या ३०६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पैठण तालुक्यात सर्वाधिक १०१ टँकर सुरू आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात यंदा जानेवारीपासून पाणीटंचाई आहे. मे महिन्यात ती तीव्र झाली. मेअखेरीस जिल्ह्यात १५० पेक्षा जास्त गावे टंचाईग्रस्त झाली. पूर्ण जून महिना पावसाविना गेल्यामुळे टंचाई परिस्थिती आणखी कठीण बनली आहे.
विशेषत: औरंगाबाद, पैठण, गंगापूर, वैजापूर आणि फुलंब्री तालुक्यांना टंचाईची सर्वाधिक झळ बसली आहे. या पाच तालुक्यांमध्येच ३०० हून अधिक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यापैकी १८० गावांना टँकरने पाणी पुरविले जात आहे. संपूर्ण जिल्ह्यात २०९ गावांना ३०६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पैठण तालुक्यातील ६८ गावांना १०१ टँकरने पाणी पुरविले जात आहे. सोयगाव आणि खुलताबाद तालुक्यात मात्र अद्याप एकही टँकर सुरू करण्याची गरज भासलेली नाही. जिल्ह्यात काही ठिकाणी खाजगी विहिरी अधिग्रहित करून पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्ह्यात प्रशासनाने सध्या २४९ गावांमध्ये ३१३ खाजगी विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. त्यापैकी ९३ विहिरींवरून टँकर भरले जात आहेत. उर्वरित २२० विहिरींमधून मात्र, त्याच परिसरातील लोकांना पाणी उपलब्ध करून दिले गेले आहे.
वैजापूर तालुक्यात सर्वाधिक ७५ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. गंगापूर तालुक्यात ५१, पैठण तालुक्यात ४०, औरंगाबाद तालुक्यात ४०, कन्नड तालुक्यात ३६, सिल्लोड तालुक्यात ५५, सोयगाव तालुक्यात २, खुलताबाद तालुक्यात ३ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
खाजगी टँकरवर भर
टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाचा खाजगी टँकरवर भर दिसून येत आहे. सध्या जिल्ह्यात ३०६ टँकर सुरू आहेत. त्यापैकी केवळ २४ टँकरच शासकीय आहेत. उर्वरित २८२ टँकर हे खाजगी मालकांचे आहेत.
तालुकागावेटँकर
औरंगाबाद२१ ४४
फुलंब्री२६ २९
पैठण६८ १०१
गंगापूर३६ ५०
वैजापूर३८ ५२
खुलताबाद०० ००
कन्नड०४ ०४
सिल्लोड१६ २६
सोयगाव०० ००
एकूण२०९३०६