पाण्याच्या उघड्या टाक्यांवर हातोडा

By Admin | Updated: November 17, 2015 00:31 IST2015-11-17T00:01:52+5:302015-11-17T00:31:41+5:30

लातूर : डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी मनपा प्रशासनाने आता उघड्या पाण्याच्या टाक्या फोडून टाकण्याची मोहीम हाती घेतली आहे़ सोमवारी शहरातील चार ठिकाणी टाक्या फोडण्यात आल्या आहेत़

Hammer on open tap water | पाण्याच्या उघड्या टाक्यांवर हातोडा

पाण्याच्या उघड्या टाक्यांवर हातोडा


लातूर : डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी मनपा प्रशासनाने आता उघड्या पाण्याच्या टाक्या फोडून टाकण्याची मोहीम हाती घेतली आहे़ सोमवारी शहरातील चार ठिकाणी टाक्या फोडण्यात आल्या आहेत़ वारंवार आवाहन करूनही नागरिकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांच्या आदेशान्वये आरोग्य विभागाने ही मोहीम हाती घेतली आहे़ जनावरांना पिण्यासाठी ठेवण्यात आलेल्या टाक्यांवर आरोग्य विभागाने आता विशेष लक्ष केंद्रित केले आहे़
लातूर शहरात डेंग्यूसदृश आजाराचे प्रमाण रोखण्यासाठी अ‍ॅबेटिंग मोहीम राबवूनही फारसा प्रभाव दिसून येत नसल्याने आता पाणीसाठे नष्ट करण्यासाठी मनपाच्या आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे़ नागरिकांना कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केल्यावरही पंधरा दिवसाला नळाला पाणी येत असल्याने हा प्रयोग करायला कोणीही तयार नाही़ परिणामी, डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती वाढू लागली आहे़ डासोत्पत्तीची स्थाने उद्ध्वस्त करण्यासाठी सोमवारी आरोग्य अधिकारी डॉ़ महेश पाटील, क्षेत्रिय अधिकारी संजय कुलकर्णी, स्वच्छता निरीक्षक बोराडे, शिवाजी कुटकर यांच्या पथकाने औसा रोड भागात उघड्यावर पाण्याच्या टाक्या फोडल्या आहेत़ गोपाळ नगर, वैभव नगर, समर्थ नगर व औसा रोड भागातील विविध टाक्यांचा सर्व्हे करण्यात आला आहे़ दारात असलेले उघडे पाण्याचे हौद, टाक्या आठवड्यातून किमान एक दिवस कोरड्या ठेवल्याच पाहिजेत, त्याशिवाय डासांची उत्पत्ती थांबणार नाही, त्यामुळे नागरिकांनी स्वत:हूनही सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे़ नळाला पंधरा दिवसांतून एकवेळा येणारे पाणी साठवून ठेवले जाते, त्यावर झाकण न लावल्यास स्वच्छ पाण्यावरच डासांची उत्पत्ती वाढत आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Hammer on open tap water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.