पाडापाडीचे अर्धशतक
By Admin | Updated: January 7, 2015 01:05 IST2015-01-07T00:46:24+5:302015-01-07T01:05:58+5:30
औरंगाबाद : सातारा-देवळाई नगर परिषदेच्या वतीने अतिरिक्त बांधकाम पाडापाडीची अतिक्रमण हटाव पथकाने अर्धशतकी कारवाई केली आहे.

पाडापाडीचे अर्धशतक
औरंगाबाद : सातारा-देवळाई नगर परिषदेच्या वतीने अतिरिक्त बांधकाम पाडापाडीची अतिक्रमण हटाव पथकाने अर्धशतकी कारवाई केली आहे. आज सातारा गट नं. ३ मध्ये अश्पाक पटेल यांच्या, तर गट नं. १३० मधील मांडे यांच्या इमारतीचा प्रत्येकी एक मजला पाडण्यात आला.
अतिक्रमण हटाव पथकाने २ डिसेंबरपासून सातारा- देवळाई परिसरातील अतिरिक्त बांधकामांवर हातोडा चालविला असून, मंगळवारी सकाळी अतिक्रमण हटाव पथकाच्या टीमने दत्त मंदिराजवळील जी प्लस तीन इमारतीच्या एका अतिरिक्त बांधकामाचे छत ब्रेकरने ठिसूळ केले. दुपारनंतर साताऱ्यातील गट नं. ३ मधील जी प्लस ४ च्या एका मजल्यावर हातोडा व ब्रेकरने घाव करण्यात आले.
पथकाने निवासी वसाहतीवरील कारवाई थांबविली आहे; परंतु ३५० कामांना नोटिसा बजावल्या असून, चटई क्षेत्राच्या व्यतिरिक्त बांधकामाचा निकष लावून हातोड्याचा जोर कायम ठेवत ५० बांधकामे पाडली आहेत.
मुख्यमंत्र्यांना साकडे
घरावरील कारवाई रोखावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना औरंगाबादेतून मुंबईला गेलेल्या एका बांधकाम व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले आहे. मात्र, कारवाईचा हातोडा थांबलेला नसून नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान सुरूच आहे.
ही कारवाई शिथिल करून मालमत्ता कायम करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्वप्नील अकोलकर, दीपक जगदाळे, नशीर पटेल, भारत चौरे यांच्यासह अनेकांनी केली आहे.