गारपीट मदत वाटप यादीत गोंधळच गोंधळ
By Admin | Updated: June 11, 2014 00:34 IST2014-06-11T00:15:33+5:302014-06-11T00:34:11+5:30
केळीगव्हाण: बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील सुमारे सातशे शेतकऱ्यांचे गारपिटीत मोठे नुकसान झाले होते.

गारपीट मदत वाटप यादीत गोंधळच गोंधळ
केळीगव्हाण: बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील सुमारे सातशे शेतकऱ्यांचे गारपिटीत मोठे नुकसान झाले होते. तीन महिन्यानंतर आता बँकेने केवळ २९२ पात्र लाभार्थ्यांची यादी लावली. त्यामुळे अर्धेअधिक गावच्या शेतकऱ्यांना मदत यादीतून वगळ्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यादीत मोठा गोंधळ झाल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत.
बदनापूर तालुक्यात फेबु्रवारी व मार्च महिन्यात अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती. सलग तीन वेळा गाव व परिसरातील शेतकऱ्यांना गारपिटीचा फटका बसला. त्यात शेतातील गहू, ज्वारी, हरभरा तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसानीची अनेक राजकीय पुढाऱ्यांनी तसेच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. तसेच महसूल विभाग व कृषि विभागाच्या वतीने संयुक्तपणे त्याचे पंचनामेही करण्यात आले. त्यात गावातील ५० टक्क्यांच्यावर नुकसान झालेल्या सुमारे ६०० ते ७०० शेतकरी होते. तसेच ५० टक्क्यांच्या आत नुकसान झालेले ५०० च्यावर शेतकरी आहेत. शासनाच्या नियमानुसार ५० टक्क्यांच्यावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना गारपिटीचे अनुदान वाटप करण्यात येत आहे. जिल्हाभरात अनेक ठिकाणी बँकामार्फत हे अनुदान वाटप करण्यात आले. केळीगव्हाण गावातील शेतकऱ्यांना मात्र अनुदानासाठी आतापर्यंत वाट पाहावी लागली. सोमवारी गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेलगाव शाखेत लागली. मात्र यादीत फक्त २९२ शेतकऱ्यांचीच नावे त्यात आहेत. त्यामुळे नुकसान झालेल्या अनेक शेतकरी वंचित राहिले आहे. नव्याने पंचनामे करुन तात्काळ अनुदान वाटप करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. (वार्ताहर)
पुरवणी यादी तयार करण्याची मागणी
पन्नास टक्क्यांच्यावर नुकसान होवून व त्याचे रितसर पंचनामेही करण्यात आले. मात्र बँकेत यादी लावल्यानंतर अनेकांचे नावे गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला. नावे गायब झाली कशी? त्याची चौकशी करण्यात यावी व पुरवणी यादी तयार करून त्यात वगळलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी रामनाथ मदन, काकासाहेब मदन, निवृत्ती मदन , अरूण मदन, भगवान मदन आदींनी केली आहे.