मनपावर पालकमंत्र्यांची टीका
By Admin | Updated: January 4, 2016 00:24 IST2016-01-03T23:52:45+5:302016-01-04T00:24:15+5:30
औरंगाबाद : महापालिकेत सेनेचाच महापौर असताना पालकमंत्री रामदास कदम यांनी रविवारी पालिकेच्या कारभारावर सडकून टीका केली.

मनपावर पालकमंत्र्यांची टीका
औरंगाबाद : महापालिकेत सेनेचाच महापौर असताना पालकमंत्री रामदास कदम यांनी रविवारी पालिकेच्या कारभारावर सडकून टीका केली. पालिकेचा कारभार म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा अशा पद्धतीने सुरू आहे. उत्पन्न वाढीला भरपूर वाव आहे, पण त्याकडे पालिकेचे लक्ष नाही, असे कदम म्हणाले. मनपाने यापुढे स्वत:च निधी उभा करून समांतर जलवाहिनी आणि भूमिगत गटार योजनेचे काम पूर्ण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
विधानपरिषद निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पालकमंत्री कदम आज पहिल्यांदाच औरंगाबादेत आले. सुभेदारी विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्राकडून पुढील टप्प्यातील निधी मिळणार नसल्यामुळे मनपाच्या समांतर जलवाहिनी आणि भूमिगत गटार योजना अडचणीत आल्या आहेत. त्यांना राज्य सरकार मदत करणार का, या प्रश्नावर पालकमंत्री कदम म्हणाले, मनपाच्या कारभाराचे मला नवल वाटते. खरे तर मनपाला पैशांची अजिबात कमी भासण्याचे कारण नाही,पण नियोजनाअभावी इथे उलट परिस्थिती आहे. मालमत्ता कराच्या वसुलीचे प्रमाण अवघे १८ टक्के आहे. शिवाय शहरातील ५० ते ६० टक्केइमारतींना अजूनही मालमत्ताकर लागलेला नाही. सर्व गोष्टींचे योग्य नियोजन केले तर आणखी चार- पाचशे कोटी रुपये सहज जमतील. त्यामुळे कुणाकडेही हात पसरायची गरज भासणार नाही. म्हणून आता मनपानेच योग्य नियोजन करून निधी उभारावा आणि त्यातून दोन्ही योजनांची कामे करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आ. संदीपान भुमरे, जिल्हाधिकारी निधी पांडे, पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, मनपातील सभागृह नेता राजेंद्र जंजाळ, शिवसेना शहरप्रमुख रेणुकादास वैद्य, बाळासाहेब थोरात आदींची उपस्थिती होती.
एमआयएमकडूनही स्वागत
पालकमंत्री कदम यांचे शहरात जोरदार स्वागत झाले. विमानतळावर आणि सुभेदारी विश्रामगृहावर त्यांच्या स्वागतासाठी सेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. एमआयएमकडूनही पालकमंत्र्यांचे स्वागत केले गेले. एमआयएमतर्फे
कदम यांनी यापुढे समांतर जलवाहिनीच्या कामावर आपले लक्ष असेल, असे स्पष्ट केले. समांतरमधील दोन कलाकार मला ठाऊक आहेत. त्यातील एक कलाकार नुकताच गेला, अजून एक राहिला आहे.
४त्याच्यावरही माझे लक्ष आहे, असे कुणाचाही नामोल्लेख न करता म्हणाले. मुळात समांतरचे करारच चुकीचे झाले, त्यामुळेच आज अडचणी उभ्या राहत आहेत, असा आरोपही पालकमंत्र्यांनी यावेळी केला.
पालकमंत्री कदम यांनी कचरा पेट्यांच्या अखर्चिक निधीवरूनही मनपावर टीकेची झोड उठविली. कचरा पेट्यांच्या खरेदीसाठी मनपाला आम्ही जिल्हा नियोजन समितीतून निधी मंजूर केला, पण चार पाच महिने झाले तरी तो निधी मनपाने खर्च केलेला नाही, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. तसेच बाजूला बसलेल्या जिल्हाधिकारी निधी पांडे यांना उद्देशून त्यांनी उद्याच मनपा आयुक्तांना बोलावून घ्या आणि विचारणा करा, अशी सूचनाही केली.