जीटीएलने हस्तांतरणानंतर वीज बिल घेतले
By Admin | Updated: December 8, 2014 00:23 IST2014-12-08T00:17:44+5:302014-12-08T00:23:13+5:30
अशोक कारके, औरंगाबाद महावितरणने जीटीएलकडून शहरातील वीजपुरवठ्याचा ताबा घेतला आहे.

जीटीएलने हस्तांतरणानंतर वीज बिल घेतले
अशोक कारके, औरंगाबाद
महावितरणने जीटीएलकडून शहरातील वीजपुरवठ्याचा ताबा घेतला आहे. जीटीएलने वीजपुरवठ्याच्या हस्तांतरणानंतर काही मोठ्या वीज ग्राहकांचे (उद्योजकांचे) विज बिल घेतले आहे. कंपनी ही माहिती महावितरणला देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
जीटीएलकडून महावितरणने १५ नोव्हेंबर रोजी वीजपुरवठा ताब्यात घेतला आहे. यानंतर कंपनीने काही उद्योजकांचे वीज बिल चेकच्या माध्यमातून घेतले आहे. शहरातील वीज ग्राहकांकडे १३४ कोटींचे वीज बिल थकले आहे. ते वसूल करण्यासाठी महावितरणसमोर मोठे आव्हान आहे.
महावितरणने वीज ग्राहकांकडून वीज बिल वसुली सुरू केली आहे. नागरिकांना बिल भरता यावे म्हणून पहिल्या टप्प्यात शहरात २२ ठिकाणी वीज बिल भरणा केंद्र सुरू केले आहे. त्या पेक्षा एक पाऊल पुढे टाकून विविध ठिकाणी ३ एटीपी मशीन बसविल्या आहेत. ४ बसविणार आहेत.
वीज बिलाच्या वसुली मोहिमेमध्ये काही उद्योजकांनी हस्तांतरणानंतर जीटीएलकडे वीज बिल भरल्याची माहिती समोर आली आहे. हे मोठ्या ग्राहकांचे (उद्योजकांचे) चेक कंपनीने आपल्या खात्यावर जाम करून घेतले आहेत. कंपनी हस्तांतरणानंतर किती ग्राहकांनाचे बिल घेतले, त्यांची नावे आणि रक्कम आदी माहिती महावितरणाला देण्यास टाळाटाळ करीत आहे.
कंपनीने ही माहिती महावितरणला द्यावी यासाठी अधिकाऱ्यांनी अनेक वेळा प्रयत्न केले; पण त्यांना जीटीएलने काही माहिती दिली नाही. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अखेर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखीपत्र देऊन माहिती मागितली आहे.
आता कंपनीचे वरिष्ठ अधिकारी हस्तांतरणातील असहकार्य मोहीम थांबवून महावितरणला माहिती देणार का? महावितरण माहिती न दिल्यामुळे कंपनीची एनओसी थांबविणार का? असे अनेक प्रश्न यातून उभे आहेत. या मनमानी कारभाराविषयी जीटीएलचे स्थानिक प्रमुख जगदीश चेलारामानी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल उचलला नाही. कंपनीच्या इतर अधिकाऱ्यांनी याविषयी बोलण्यास टाळले.