छावण्या बनल्या ठेकेदारांसाठी कुरण
By Admin | Updated: September 7, 2015 00:01 IST2015-09-06T23:38:57+5:302015-09-07T00:01:22+5:30
व्यंकटेश वैष्णव , बीड दोन दिवसापूर्वी दुष्काळ दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर चमकोगिरी करत सुरू केलेल्या चारा-छावण्यांपैकी

छावण्या बनल्या ठेकेदारांसाठी कुरण
व्यंकटेश वैष्णव , बीड
दोन दिवसापूर्वी दुष्काळ दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर चमकोगिरी करत सुरू केलेल्या चारा-छावण्यांपैकी बहुतेक चारा-छावण्या गुंडाळल्याचा प्रत्यय रविवारी आला. महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी रविवारी अचानक छावण्यांना भेट देऊन पंचनामा केला असता छावण्यांमध्ये बोटावर मोजण्या इतकीच जनावरे होती.
मोठा गाजावाजा करत चारा छावण्या सुरू केल्या. जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अचानक चारा-छावण्यांना भेट दिली असता, छावण्यावर कुठे वीस तर पंन्नास अशी जनावरे आढळून आल्याने अधिकाऱ्यांनी डोक्याला हात लावला. बीड जवळील पालवण येथील चारा-छावणीचा अपवाद वगळता बहुतेक छावण्यांवर जनावरे नव्हते. जिल्हयात मोठ्या प्रमाणात दुष्काळ आहे, म्हणून शासनाने जिल्ह्यात १७ चारा छावण्यांना मंजूरी दिली आहे. छावणी मंजूर करून घेण्यासाठी पुढाऱ्यांचे शिफारस पत्र जोडून मंजूरी मिळविली. एवढेच नाही तर काहींनी जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा देखील प्रयत्न केला होता. चारा-छावण्यांना मंजूरी मिळाल्या नंतर शासनाने दिलेल्या निकषाकडे चारा-छावणी चालक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र रविवारी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना पहावयास मिळाले.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या आदेशावरून बीडचे उप विभागीय अधिकारी डॉ. विकास सुर्यवंशी व तहसीलदार अमोल कदम यांनी तालुक्यातील छावण्यांना रविवारी अचानक भेट देऊन छावण्यातील जनावरांची संख्या तपासली. बीड जवळील पालवण येथील चारा छावणी सोडता इतर कुठल्याच चारा-छावणीवर दोनशे पेक्षा जास्त जनावरे आढळून आले नाहीत. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे चारा छावणी चालकांकडून पालन होत नसल्याचे चित्र आज तरी बीड जिल्हयातील चारा छावण्यांवर पहावयास मिळत आहे.
सोमनाथ खताळ ल्ल बीड
शनिवारी रात्री झालेल्या पावसाने चारा छावण्यांमध्ये तारांबळ उडाली. जनावरांसाठीचा चाराही भिजला आणि शेतकरी, जनावरेही पावसात झोडपले. रविवारी सकाळी भिजलेला चाराच जनावरांना वाटप केला जात होता. तीन हजार जनावरांना चारा वाटपासाठी वजनकाटा एकच असल्याने शेतकऱ्यांना वेटींग करावी लागली. शहरापासून जवळच असलेल्या पालवण येथील चारा छावणीत ‘लोकमत’ने रविवारी केलेल्या पाहणीत ही माहिती समोर आली.
दोन दिवसांपूर्वीच या छावणीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. छावणीमध्ये तीन हजाराहून अधिक जनावरे आहेत. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास छावणीला भेट दिली. रस्त्यावरच दोन निळ्या दिव्याच्या गाड्या उभ्या होत्या. तर दुतर्फा शेतकरी जनावरांना निवारा करण्यासाठी धडपडत होते. कोणी लाकडे बांधत होती तर कोणी पोत्याचं चवाळं त्यावर झाकत होते. उजव्या बाजुने छावणीत प्रवेश केला. प्रवेश करताच शनिवारी रात्री झालेल्या पावसाने रस्ता चिखलमय झाला होता. तर काही पदाधिकारी जनावरे मोजत होती. शेतकऱ्यांनी चारा घेण्यासाठी लावलेल्या लांबच्या लांब रांग याठिकाणी दिसून आल्या. दोन कर्मचारी ओळखपत्र बघून एक कुपण आणि त्यावर द्यावयाचा चारा (किलोमध्ये) लिहीत होता. एवढ्यात छावणी प्रमुख एस.एन.शेळके येथे आले. उपविभागीय अधिकारी विकास सुर्यवंशी आणि तहसीलदार अमोल कदम आले. त्यांनी लगेच रजिस्टर तपासायला सुरूवात केली. रात्रीच्या पावसाने उसाच्या चाऱ्याचा वास सुटला होता. हाच चारा जनावरांना वाटप केला जात होता. चारा वेळेवर मिळत नसल्याने जनावरांच्या दावणी चाऱ्याच्या प्रतिक्षेत होत्या. चारा घेण्यासाठी बैलगाड्यांच्या लांबलचक रांगा होत्या.
रोज ८०० जनावरांची वाढ
येथील छावणीत रोज ७०० ते ८०० जनावरांची वाढ होत आहे. आतापर्यंत ३ हजार १९० जनावरे दाखल आहेत. परिसरातील २३ गावातील शेतकऱ्यांनी जनावरे आणली आहेत. याठिकाणी घटसर्प व फऱ्या रोगाने ग्रासलेल्या १००८ जनावरांचे लसीकरण केल्याची नोंद पशुधन अधिकाऱ्यांकडे आहे.