‘त्या’ शेतकऱ्यांना शेततळे मंजूर करा
By Admin | Updated: June 16, 2014 00:13 IST2014-06-15T23:53:48+5:302014-06-16T00:13:01+5:30
परभणी : ज्या शेतकऱ्यांकडे फळबागा आहेत, अशा गरजू शेतकऱ्यांना शेततळे मंजूर करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी एस़ पी़ सिंह यांनी दिल्या़
‘त्या’ शेतकऱ्यांना शेततळे मंजूर करा
परभणी : ज्या शेतकऱ्यांकडे फळबागा आहेत, अशा गरजू शेतकऱ्यांना शेततळे मंजूर करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी एस़ पी़ सिंह यांनी दिल्या़
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राष्ट्रीय फलोत्पादन अभियान जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते़ सिंह म्हणाले, जिल्ह्यामध्ये शेततळ्यांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली होती़ ती तत्काळ पूर्ण करावित़ शेततळे पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या़ राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेतकऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या विविध घटकांचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना झाला पाहिजे़ यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी आढावा घ्यावा़
पेरू पिकाव्यतिरिक्त पपई, केळी, आंबा आदी पिकांवर प्रक्रिया करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे़ पेरूची घन लागवड पद्धतीने १५ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे़ झरी येथे फळउद्योग सुरू असून, त्या ठिकाणी आंबा व पेरू या फळ पिकांवर प्रक्रिया केली जाते़ हळद पिकाचे युनिट स्थापन करणे, हळदीचे पावडर व पानांपासून तेल काढण्याचा उद्योग सुरू करणे, हरितगृह, शेडनेट हाऊसमधील फुल शेतीचे उत्पादन या विषयावर प्रशिक्षणासाठी परभणी, गंगाखेड व पालम तालुक्यातील शेतकऱ्यांना पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे पाठविण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले़ (प्रतिनिधी)
जांब, पोखर्णीत पॅक हाऊस
गंगाखेड तालुक्यातील मरडसगाव येथे ८ आणि परभणी तालुक्यातील जांब व पोखर्णी येथे प्रत्येकी ५ पॅक हाऊस झाले आहेत़ या पॅक हाऊसचा वापर संत्रा, मोसंबी तसेच भाजीपाला पिकासाठी केला जातो, अशी माहिती यावेळी देण्यात आली़
महात्मा फुले जल व भूमी संधारण अभियान २०१४-१५ अंतर्गत जल संधारण विभाग, लघूसिंचन विभाग व जिल्हा परिषदेच्या विविध योजनेतून बांधण्यात आलेल्या सिमेंट नाला बांध व माती नाला बांध दुरुस्ती, पाझर तलाव, गाव तलाव, पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची दुरुस्ती, बळकटीकरण आदी कामे करावेत़
शेतकऱ्यांना अपघात विमा
शेती व्यवसाय करताना व नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यांवरील अपघात, वीज पडणे, विजेचा शॉक बसणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही अपघातामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना मृत्यू ओढावतो़
काहींना अपंगत्व येते, घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते़ अशा आपद्ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी शेतकरी अपघात विमा योजना लागू केली आहे़, अशी माहिती बैठकीत देण्यात आली़