सरकारी गव्हावरच चोरट्यांचा डल्ला
By Admin | Updated: October 22, 2014 01:17 IST2014-10-22T00:49:19+5:302014-10-22T01:17:40+5:30
जालना : रेल्वे प्रशासनाने उभारलेले हायमॅक्स दिवे बंद ठेवले जात असल्याने अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी सील तोडून गव्हाचे १७ पोते पळवून नेण्याचा प्रयत्न केला.

सरकारी गव्हावरच चोरट्यांचा डल्ला
जालना : रेल्वे प्रशासनाने उभारलेले हायमॅक्स दिवे बंद ठेवले जात असल्याने अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी सील तोडून गव्हाचे १७ पोते पळवून नेण्याचा प्रयत्न केला. उभ्या रेल्वे गाडीतून गहू चोरीचा प्रयत्न झाला. मात्र रेल्वे सुरक्षा पथकाने दरवाजा उघडल्याने पोते कोसळले, असा देखावा केला. पहाटे ६ वाजेपर्यंत सदर प्रकरणाची चौकशी सुरू होती.
जालना रेल्वे स्थानकालगतच्या मालधक्क्यावर मालाच्या सुरक्षेसाठी कोणतीही सक्षम यंत्रणा नाही. शिवाय खत, गहू, सिमेंट अस्ताव्यस्त पडलेले दिसून येते. त्यातच माल धक्क्यावरील हायमॅक्स दिवे बंद ठेवले जातात. माल धक्क्यावरच ५० ते ७५ ट्रकची कायम पार्कींग केली जाते. यात झोपणारे कोण? हे सुरक्षा विभागालाही सांगता येणे अवघड आहे.
सोमवारी रात्रीच्या सुमारास सील तोडून गव्हाचे पोते पळविण्यात आले. हा प्रकार पहाटे सुरक्षा पथकाच्या लक्षात आला. ठिकठिकाणी पडलेले गव्हाचे पोते गोळा करून या पथकाने माल वाहतूक विभागाच्या कक्षात साठवून ठेवले. सील तुटले तर कोसळलेले गव्हाचे पोते लोहमार्गालगत सापडणे गरजेचे होते. माल धक्क्यावरील ओट्याखाली म्हणजेच लोहमार्गापासून तब्बल ४० ते ५० फूट अंतरावर पोते पडलेले दिसल्याचे लोहमार्ग सुरक्षा पथकातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. बी. एल. एन. एच. एल. ३३१३१० ९२८९७ एन.सी.आर. या डब्यातून गव्हाचे पोते सील तुटून कोसळल्याचे रेल्वे सुरक्षा बलाचे जमादार राऊत यांनी सांगितले. या डब्याचे सील तुटले असते तर त्यावर डकविण्यात आलेले सील पूर्णत: फाटलेले असते. मात्र हे सील व्यवस्थित काढून बाजूला फेकण्यात आलेले आढळून आले. या सीलला कोठेही धक्का लागलेला नाही. चोरीनंतर हे सील पुन्हा जसेच्या तसे लावण्याचा प्रयत्न बहुतेक चोरट्यांचा असावा, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला.
सुरक्षा बल आणि रेल्वे प्रशासनाने मात्र असे काहीच घडले नसल्याचे कागदोपत्री दाखविले आहे. या पंचनाम्यावर स्टेशन उपअधीक्षक शैलेंद्रकुमार, सुरक्षा बलाचे पोलिस शिपाई गंगावणे, पाँईट मॅन कर्नक के. पुरूषोत्तम आदींच्या सह्या आहेत. त्यांनी जप्त केलेले १७ पोते पुन्हा मालधक्क्यावर जमा केले आहेत.
जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड यांनी सांगितले, रेल्वे सुरक्षा बल अथवा रेल्वे प्रशासनाने या चोरीचा कोणताही अहवाल पुरवठा विभागाला दिला नाही. ही बाब फूड कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या कार्यकक्षेत ही बाब येते. त्यांनी रेल्वेतून आलेला माल वखार महामंडळाच्या गोदाम ठेवल्यानंतर पुरवठा विभाग हे माल उचलल्यानंतर त्याला जबाबदार ठरतो. (प्रतिनिधी)